चिपळूण – चिपळूण शहरातून वाहत जाणारी शिवनदी तसेच शहरानजीकची वाशिष्ठी नदी या दोन्ही नद्यांचा जोपर्यंत पूर्णपणे गाळ काढला जात नाही, तोपर्यंत चिपळूण बचाव समिती लढा सुरू ठेवेल देईल व हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा काल झालेल्या बैठकीत समितीच्या वतीने देण्यात आला.
या बैठकीत यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. येत्या महिन्यामध्ये मंत्रीस्तरावर बैठक होवून चिपळूण शहरातील गाळ तसेच निळी व लाल रेषांबाबत होणार आहे. हा निर्णय शहरवासीयांच्या हिताच्या दृष्टीने व्हावा याकरिता शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता व सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने माहितीची पत्रके वाटणे, बॅनर लावणे तसेच सह्यांची मोहीम अशा चळवळीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यावेळी असे ठरवण्यात आले की, विविध व्यावसायिक व व्यापारी संघटनांनी आपल्या पाठिंब्याचे व सहभागाचे पत्र चिपळूण बचाव समितीकडे द्यावेत व आपला सहभाग नोंदवावा. यामध्ये मेडिकल असोसिएशन इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल असोसिएशन,कापड व्यापारी, भांडी व्यापारी, पानपट्टी संघटना व इतर संघटनांनी आपापल्या लेटरहेडवर लेखी पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.याच वेळी शहरातून एक जनजागृती फेरी काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. शासनाच्या संबंधित खात्याला जाऊन पुन्हा एकदा निवेदन देण्याचाही ठरवण्यात आले. जोपर्यंत गाळ उपसण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्यात येणार आहे तसेच दोन्ही नद्याचा गाळ पूर्णपणे काढण्याचा आग्रह व मागणी यावेळी करण्यात आली. पाटबंधारे खात्याने आपली जबाबदारा झटकू नये असाही इशारा समितीच्या बैठकीत देण्यात आला. त्याचबरोबर चिपळूण नगरपरिषदेने गटारे साफ करून तसेच नाले नालेसफाईचे काम त्वरित हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीला बापू काणे, अरुण भोजने, शिरीष काटकर, सतीश कदम, राजेश वाजे, उदय ओतारी, सुनील जांभेकर महेंद्र कासेकर शहानवाज शहा समीर जानवलकर, रमन डांगे, गुलमोहम्मद शहा आदी उपस्थित होते.