चिपळूण – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाविरोधात तसेच वाढती महागाई, बेरोजगारीमुळे देशावासियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला येथील काँग्रेसच्यावतीने सक्रिय पाठिंबा दर्शवत चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली चिपळुणात आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘सोनियाजी आगे बढो, राहुलजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीन विधेयकाचा जोरदार निषेध करण्यात आला.
शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा असाच सुरू राहील, अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली.
गेल्या वर्षभरापूर्वी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले आहेत. या कृषी विधेयकाचा शेतकर्यांनी विरोध केला असून देशभरातील शेतकरी गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन, उपोषण करीत आहे. मात्र, या आंदोलनाची मोदी सरकारने अद्याप दखल घेतली नाही. यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात काँग्रेसने सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला यानुसार काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी नेते राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार चिपळुणात तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या विधेयकविरोधात तसेच मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. शेतकरीविरोधी तीन विधेयक रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या माध्यमातून दिला. यावेळी प्रशांत यादव म्हणाले की, शेतकरी संघटनेने मोदी सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन, उपोषण छेडले आहे. मात्र, या आंदोलनाची भाजप सरकारने दखल घेतली नाही. या शेतकऱ्यां दबाव आणला जात आहे. खोटेनाटे आरोप केले जात आहेत. मात्र, स्वाभिमानी बळीराजा हटायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व भविष्यातही राहील असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. मोदी सरकारच्या कालखंडात महागाई गगनाला भिडली आहे. बेरोजगारी वाढली आहे. दोन कोटी सुशिक्षित तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तरीही मोदी सरकार जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलत नाहीत, असा आरोप यावेळी केला. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी धोरणाला विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज चिपळूण काँग्रेसने आंदोलन केले आहे, असे शेवटी श्री. यादव यांनी नमूद केले. यावेळी काँग्रेसचे नेते इब्राहीम दलवाई, नगरसेवक कबीर काद्री, काँग्रेस अनुसूचित जाती जमाती प्रदेश समन्वयक सुनीलभाऊ सावर्डेकर आदींनी मोदी सरकार व कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. यावेळी नगरसेवक करामत मिठागरी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेस अल्पसंख्यांक सेल विभाग तालुकाध्यक्ष अन्वर जबले, काँग्रेसच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, अश्विनी भुस्कुटे, सरफराज घारे, राकेश दाते, युवक जिल्हा कार्यकारणी सदस्य गुलजार कुरवले, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपिले, शहरअध्यक्ष अल्ताफ दळवी, उपाध्यक्ष दिलावर दिवेकर, मैनुद्दीन सय्यद, निजामुद्दीन लांडगे, नंदू खंडजोडे, सरफराज परकार, दिलवर फकीर, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्ष गौरी हरदारे, अल्पसंख्याक सेलचे संकेत नरळकर, कौसर परकार आदी उपस्थित होते.