गुहागर ; सामाजिक वनीकरणची निधी अभावी वणवण

0
151
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्याचे सामाजिक वनीकरण विभाग गेले वर्षभर आर्थिक विवंचनेत सापडले आहे. येथील कार्यालयाचे भाडे दोन वर्षे थकले असून वीजबिलासह रोपवाटिकांचा खर्चही थकीत असल्याचे चौकशीअंती पुढे येत आहे. तसेच लागवड केलेल्या रोपांना पाणी देण्यासाठीचा लागणारा खर्च, वनमहोत्सवातील रोपे वाहतुकीचा खर्चही अद्याप आलेला नसल्याने येथील वनिकरणची निधीअभावी वणवण सुरु आहे.

गेले दोन वर्षे गुहागर तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाला निधीच मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी केलेल्या लागवडीच्या रोपांना वनवास भोगावा लागत आहे. या रोपांना पाणी देण्यासाठी खर्च लागतो तो अद्याप आलेला नाही. उन्हाळ्यात लागवड केलेली काही रोपे वणव्यांनी होरपळून गेली. पाणी घालण्यासाठी मजूर उपलब्ध झाले होते, मात्र त्यांना मजुरी देण्यासाठी पैसेच नसल्याने रोपे जगविण्याचा प्रश्न दरवर्षी उभा राहत आहे.

गुहागर सामाजिक वनीकरणचे शृंगारतळी येथे कार्यालय आहे. गेल्या 2 वर्षापासून कार्यालयाचे भाडे, वीजबील व स्टेशनरीचा खर्चच आलेला नाही. तालुक्यात असलेल्या रोपवाटिका यांचा खर्चही दोन वर्षे होऊनही मिळालेला नाही. खर्चच आलेला नसल्याने रोपवाटिकांना पाणी देणे, त्याचा खर्च कुठून करायचा असा यशप्रश्न येथील कर्मचाऱ्यांपुढे आहे. वनमहोत्सव काळातील रोपे वाहतुकीचा खर्च व रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या वृक्ष लागवडीचा खर्चही अद्याप मिळालेला नाही. सामाजिक वनीकरणची ही स्थिती गुहागरमध्ये आहे तर जिल्ह्यामध्ये कशी असेल, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शासन एकीकडे कोटीच्या कोटी वृक्षलागवडीच्या घोषणा जाहीर करते मात्र, ही वृक्ष जगविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी वेळेवर देत नसल्याने असे उपक्रम राबवायचे कसे, असाही प्रश्न सामाजिक वनिकरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

रोप लागवड जोमात

गुहागर सामाजिक वनिकरणची एकिकडे निधीअभावी वणवण सुरु असली तरी येथील कर्मचारी वर्ग पावसाळ्याच्या मुहूर्तावर रोप लागवडीत उतरलेला दिसून येत आहे. सामाजिक वनिकरणचे वृक्षलागवडीचे हे जरी काम असले तरी आर्थिक प्रकारचे सोंग त्यांना आणता येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. केवळ रोपे लागवडीचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून रोप लागवड आमच्याच खर्चातून सुरु असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने खासगीत व्यक्त केली.

प्रतिक्रिया – घरखर्च कसा भागवायचा

जुलै 2019 मध्ये गुहागर तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 3 हजार 200 रोपांची वाहतूक सामाजिक वनीकरण विभागांतर्गत केली होती. हे काम आपण पूर्ण केले. मात्र, या कामातील सुमारे 40 टक्के पैसे आपणाला अद्याप मिळालेले नाहीत. गेली दोन वर्षे माझे पैसे अडकून पडले आहेत. यासाठी वारंवार जिल्हा समाजिक वनीकरण विभागाच्या संपर्कात आहे. मात्र, प्रत्येकवेळी निधी आला नसल्याचे सांगण्यात येते.

-महेश तावडे, सामाजिक वनीकरण लागवड मजूर.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here