गुहागर -(विशेष प्रतिनिधी )- गुहागर तालुक्यातील गुहागर पालशेत नरवण या रस्त्यावरील पालशेत बाजारपेठेतील पूल हा धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने वाहतुकीसाठी बंद केला. मात्र हा पूल का ?धोकादायक झाला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता पाहून या पुलाला धोकादायक ज्यांनी बनवला अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
गुहागर तालुक्यातील पालशेत एक मोठं गाव याच पालशेत बाजारपेठेवर जवळपास दहा ते पंधरा गाव अवलंबून असतात तर याच पालशेत बाजारपेठेतून जो पूल आहे त्या पुलावरून जवळपास पंधरा ते वीस गावांना दळणवळणाचे साधन म्हणून पाहिलं जातं. मात्र गेल्या पाच दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या नदीला पूर आला आणि प्रचंड प्रमाणात पाणी येऊन या पुलावरून पाणी गेल्याने हे या पुलावरील असणाऱ्या मोरीच्या पाइपाच्या मुखावर मोठ्या प्रमाणात घाण आणि लाकडे अडकल्याने पाणी पुलाखालून न जाता पुलावरून जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या लक्षात आले याच वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने नामी शक्कल लढवत या पुलावरील मोरीच्या पाइपमधून लाकडं बाजूला काढण्यासाठी जेसीबीच्या साह्याने सुरुवात केली. मात्र त्याच वेळी ज्या जेसीबीच्या साह्याने लाकडं काढत असताना या पुलाचे दोन ते तीन खांब आहेत. त्या खांबाचे दगड निघाल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. जर जेसीबी लावला नसता आणि त्या पुलाची लाकडं जेसीबी न लावता काढली असती तर हा पूल धोकादायक झालाच नसता अशी चर्चा सध्या पालशेत या पंचक्रोशीत सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला अतिशहाणपणा या पुलावरून दळणवळण करणाऱ्या 15 गावांना भोगावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जो जेसीबी आणला होता. तो या व्हिडिओमध्ये काम करताना स्पष्टपणे दिसतोय आणि त्याच जेसीबीच्या साह्याने या पुलाचे जे खांब आहेत त्यांचे दगड काढताना सुधा दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी जेसीबी आणून हे काम केलं त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.