गुहागर ; प्रत्यक्ष पाहणी करुनच पुलावरुन वाहतुकीचा निर्णय होईल- भास्कर जाधव

0
488
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत पुलाचे पिलर नेमके किती ढासळले आहेत, हे पुलाखालचे पाणी कमी झाल्याशिवाय लक्षात येणार नाही. पाणी कमी झाल्यावरच प्रत्यक्ष पाहणी करुन हा पूल धोकादायक आहे का ते ठरविण्यात येईल व त्याची जाग्यावरच दुरुस्ती करुन तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली.

गुहागर तालुक्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. येथील प्रसिध्द असणारा व अनेक गावांना जोडणाऱ्या पालशेत पुलावरुन दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी वाहून जाते. त्यामुळे गावांचा संपर्क तुटून या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. मात्र, या पावसाळ्यात हा पूल अधिकच धोकादायक बनला आहे. या पूल धोकादायक बनल्याचे लक्षात येताच आम. भास्कर जाधव यांनी काल बुधवारी पालशेत येथे येऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या मते मुसळधार पावसाने एक मोठे झाड कोसळून ते वाहत नदीतून आले आणि या पुलाच्या दोन पिलरवर आदळले. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निकम मैडम गुहागर एसटी आगाराचे अधिकारी, वैभव कांबळे इतर प्रशासकीय अधिकारी यांना पुलाखालील पाणी कमी झाल्यावर या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

हा पूल खरोखरच धोकादायक असेल तर ढासळलेल्या पिलरचे काम कशा पध्दतीने करता येईल याबाबत निर्णय घेऊन मगच हा पूल वाहतुकीला सुरु करता येईल असे स्पष्ट केले.
ते म्हणाले, सध्या येथील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी 500 मीटरच्या अंतरावर रामाणेवाडीत पूल बांधण्यात आलेला आहे. त्याचा उपयोग सध्या तरी वाहतुकीसाठी होणे गरजेचे असेल. तसेच पालशेतला जोडणाऱ्या बायपास रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मी मंजूर करुन घेतला आहे मात्र, येथील जमीन मालकांचा प्रश्न अनिर्णित राहिल्याने पुलाचे काम सुरु झालेले नाही.येथील जमीन मालकांनी या नव्या बायपास रस्त्यासाठी जमिनी देण्यास सहकार्य करावे, यासाठी येथील नागरिकांनी बैठक घेऊन याचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही आमदार जाधव यांनी केले.

सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या पालशेत पुलाच्या दुरुस्तीविषयी बोलताना आमदार जाधव म्हणाले, हा पूल नव्याने बांधण्यास हरकत नाही. माझा कित्येक वर्षे प्रयत्न सुरु आहे मात्र, पुलाच्या दोनही बाजूला सपाटीकरण असल्याने व वस्त्या असल्याने पुलाची उंची कशी वाढविणार हा प्रश्न आहे. पुलाची उंची वाढविल्यास या भागाला पुराच्या पाण्याचा धोकाही आहे. त्यामुळे येथील नव्या पुलाच्या उभारणीविषयी कोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील, याची चाचपणी करुनच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here