चिपळूण –चिपळूण येथील बहादुरशेख नाक्यावरील चौकात चिपळूण – कराड मार्गावर पाण्याच्या पाईप लाईनसाठी खोदलेला खड्डा गेले दोन महिने जैसे थे असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने हा खड्डा खोदून ठेवल्याने पालिकेचा ही नाईलाज झाला आहे.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून
बहादुरशेख ते शिवाजीनगर या उड्डाणपुलाचे काम ही युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील पाण्याच्या पाइपलाइनचे काम अगोदर करणे आवश्यक असल्याने ते कामही हाती घेण्यात आले आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांच्यामध्ये या विषयात समन्वय नसल्याने शहरातील नागरिक तसेच वाहनचालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील पाणी पुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत. पण बहादुरशेख नाका येथे चिपळूण – कराड मार्गावर भलामोठा खड्डा खोदून ठेवल्याने एका बाजूची वाहतूक बंद आहे. त्यामुळे सा येथे वाहतूक कोंडी होऊन चौकात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या खड्ड्यांमुळे येथील रिक्षा स्टँड ही हलवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करतात. नगरपालिका तसेच स्थानिक नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी अनेकवेळा याबाबत कल्पना देऊनही संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्याने नगरपालिकेचाही नाईलाज झाला आहे. एखाद्या अपघात झाल्यास त्याला महामार्ग विभागच जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी दिली आहे.