गुहागर : गुहागर-विजापुर या महामार्गाचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण सुरू असून पावसाळ्याला सुरूवात झाली तरी या मार्गाचे काम परीपुर्ण झालेले नसल्याने या कामाचा पुरा बोजवारा उडाला आहे. बरीच कामे अपुरी असल्याने पावसाळ्यात नागरीकांना व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
मोडकाघर पुल अपुर्ण
रस्त्याच्या मुळ कामाला सुरूवात व्हायच्या अगोदरच जवळपास दोन वर्षांपुर्वी मोडकाघर धरणावरील महत्वाचा पुल धोकादायक म्हणून जाहिर केला गेला. त्यामुळे गुहागरला जाणारी वाहतूक शृंगारतळीतून पालपेणे- रानवी मार्गे गुहागरला नेण्यात येत होती. परंतू काही दिवसांनी धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर भराव टाकून पर्यायी रस्ता काढण्यात आला. पण आता पावसाळ्यात पाणी भरल्यानंतर हा मार्गही बंद होणार. एसटी चा प्रवास काखेत कळसा….. असाच होतो. त्यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि पैसाही फुकट जातो. आता पुन्हा तिच वेळ येणार आहे. हा पुल बांधणारी मनीषा कंस्ट्रक्शन ही कंपनी कामाकडे गांभिर्याने विचारच करीत नसल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे स्थानिक पुढारी व लोक प्रतिनिधी ही या कंपनीला जाब विचारण्यास सध्यातरी धजावत नाहीत. यामागचे गुपितच या निकृष्ट दर्जाच्या कामाला कारणीभूत ठरत आहे.
बाजारपेठेतील अपुर्ण गटारे
या मार्गावरील बाजार पेठांमधील दुतर्फा उभारण्यात आलेली गटारे अर्धवटच आहेत. ते अद्याप बंधिस्त करण्यात आलेले नाही. या गटारांच्या लोखंडी सळ्या उभ्या असल्यामुळे कुणाचा पाय घसरून पडल्यास अथवा वाहनांचा अपघात होवुन पडल्यास ते जीवावर बेतू शकते. गटारांचे बांधकाम ही अतिषय कमकुवत आहे. शृंगारतळी बाजारपेठेत तर या गटारांची फार परवड करून सोडली आहे.
एकंदर या रस्त्याच्या कामावर स्थानिक नागरिक प्रवाशी, वाहनचालक अक्षरश: बिथरलेले आहेत. अतिषय निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्याचे झालेले आहे. काँक्रीटल ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या कडेला कुठे मातीचा ढिग तर कुठे कंबरभर खड्डा असे चित्र आहे.
या मार्गावरील सर्व पुलांची कामे ही अपुर्ण अवस्थेत आहेत. मार्गताम्हाणे पर्यंत पुलांची हीच परिस्थिती आहे. पावसाळ्यात या पुलांवरून चिखल होऊन वाहने सरकून अपघात होऊ शकतात. अनेक ठिकाणी नाल्यांमधील माती टाकून नालेच बंद करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी ठेकेदाराशी संपर्क केला असता ते लवकरच करून देतो अशी आश्वासने मिळत आहे. महामार्गालगत असलेल्या पाणी योजनेच्या पाईपलाईन तोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितले असता उडवाउडवीचीच उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित खात्याच्या वरीष्ठ पातळी वरून या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.