खेड – निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु असल्याने वैभवसंपन्न कोकण भकास होऊ लागला आहे. जंगलतोडीला प्रतिबंध करणाऱ्याची जबाबदारी असलेला विभागच लाकुडमाफीयांच्या दबावाखाली काम करत असल्याने सुरु असलेली जंगलांची कत्तल थांबवायची कुणी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकणातील घनदाट जंगलांमध्ये नैसर्गिकरित्या पोसलेली वनसंपदा ही कोकणची खरीखुरी संपत्ती आहे. कोकणात येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करणारे कोकणचे निसर्गसौंदर्य याच वनसंपदेमुळे खुलते आहे. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गरम्य कोकणावर लाकुडमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात पोसलेली घनदाट जंगले बघता बघता साफ केली जात आहेत. मात्र याकडे वनविभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी जंगलतोड रोखण्याचे काम वनविभागाचे आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेली जंगलतोड वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नसल्याने वनविभागाचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधील कारखान्यांना लागणारा जळावू लाकुड हा कोकणातून पुरवला जातो. दरदिवशी लाकूड भरलेले शेकडो ट्रक
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे रवाना होत असतात. यातील बहुतांशी वाहतुक ही अनधिकृतपणे सुरु असते मात्र सरकारी यंत्रणाच लाकुडमाफियांची खिशात असल्याने जळावू लाकडाची वाहतुक करणाऱ्यांना कुणाचेच भय उरलेले नाही.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील घनदाट जंगले तोडून हजारो टन जळावू लाकूड, मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रात पाठवला जातो. सायंकाळी ६ वाजल्यानंतर जळावू लाकूड भरलेले ट्रक कुंभार्ली घाटामार्गे पश्चिम महाराष्ट्रात तर कशेडी घाटामार्गे मुंबईकडे रवाना होतात. मुंबईकडे जाताना भरणे नाका येथे वनविभागाचा तपासणी नाका आहे. परंतू या ठिकाणी एखाद्या लाकुडवाहू ट्रकवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे वनविभागाचे काम
कशाप्रकारे सुरु आहे याची प्रचिती येते.