चिपळूण- खेर्डी नळपाणी योजनेसंदर्भात सामंजस्याची भूमिका घेतली असती तर ही नळपाणी योजना मार्गी लागली असती, असा विश्वास चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व सुखाई परिवर्तन पॅनलचे प्रमुख प्रशांत यादव यांनी व्यक्त करताना खेर्डी गावाची नळपाणी योजना मार्गी लावण्याबरोबरच सुसज्ज क्रिडांगण, अद्ययावत बगीचा, सांस्कृतिक केंद्र आदी विकासात्मक योजना राबविण्याचा आमचा संकल्प आहे. मात्र, याकरिता सत्ता महत्वाची आहे आणि ती लोकांनी दिली तर शक्य आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत यादव यांनी दिली.
खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुखाई परिवर्तन पॅनल व सुखाई गाव विकास पॅनल आमनेसामने आले आहेत.; दोन्ही बाजूंकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले आहेत. ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही गट सरसावले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या अमलात आणल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व सुखाई परिवर्तन पॅनलचे प्रमुख प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खेर्डी गावची रखडलेली नळपाणी योजना, परप्रांतीयांचा मुद्दा, औद्योगिक वसाहतीत असलेले रिकामे भूखंड व गावच्या विकासाबाबत असलेली स्वप्न या विषयी आपली स्पष्ट भूमिका मुलाखतीदरम्यान मांडली. यावेळी ते म्हणाले की, पाणी योजनेच्या बाबतीत दुर्देव वाटतं. आमचे सहकारी होते. पाच वर्षांमध्ये योजना का झालं नाही? आपण निवडून गेल्यानंतर काही वैयक्तिक आपल्यात मतभेद असू शकतात. परंतु, पाच वर्षात आपण काही बांधिलकी जपायची असते. ही बांधिलकी जपतांना गावाच्या हितासाठी एकमेकांना समजून घेतलं असतं तर खेर्डीची १४ कोटींची योजना झाली असती, असे मत त्यांनी यावेळी नमूद केले.
जसं खेडी गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील व लोकांच्या नजरा असतात तसेच विकासाच्या बाबतीत इथली लोक फार जागरूक असतात आणि खरं म्हटलं तर ही योजना न होणं याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत वाटते असं व्हायला नाही पाहिजे होतं.
अशा गोष्टीमुळे राजकीय क्षेत्रात काम करणारी आम्ही माणसं कुठेतरी कमी पडत आहोत. लोकांच्या विश्वासाला कमी पडलो आहोत. खरं म्हटलं तर हे जमवून घेतलं असतं तर काही प्रश्नांवर सामंजस्याने चर्चा करून तोडगा निघाला असता तर कदाचित आजची खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असती असा विश्वास यावेळी प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
यावेळी यादव यांनी खेर्डी गावच्या नळपाणी पाणी योजनेवर अधिक भाष्य करताना ही योजना कार्यान्वित झाली पाहिजे. शेजारच्या पिंपळी गावची ८ ते ९ कोटींची नळपाणी योजना पूर्णत्वास गेली. मात्र आमची पाणी योजना मार्गी लागली नाही. खेड्यातील आम्ही काही लोक तालुक्याचे नेतृत्व करतो. त्यामुळे ही बाब आमच्या दृष्टीने कमीपणाची आहे. ही चूक सुधारण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करून ही योजना कार्यान्वित कशी होईल यासाठी सर्वांचे प्रयत्न राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
खेर्डी गावातील परप्रांतीयांच्या वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, परप्रांतीयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबण्याची गरज आहे. ही मंडळी येतात कुठून ? तर या लोकांना कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन येत असतो. मात्र, पुढील काही गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे एक उदाहरण देऊन स्पष्ट केले. खेर्डी औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणार्या कुशल-अकुशल कामगारांची यादी व संपूर्ण माहिती कंपनी व्यवस्थापनाने आमच्याकडे देण्याची गरज आहे. तरच पुढील काही प्रश्नांवर मात करणे शक्य होणार आहे, असे परप्रांतियांच्या मुद्द्यावर प्रशांत यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी गेल्या काही वर्षांपूर्वी सरपंचपदी असताना केलेल्या कामांचा त्यांनी थोडक्यात आढावा दिला. ते पुढे म्हणाले की सरपंच पदाचा कालावधी कमी मिळाला असेल मात्र या कालावधीत या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये खेर्डी ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आली होती. या ठिकाणी तत्कालीन सदस्य तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ९० लाख रुपयांच्या निधीतून खेर्डी ग्रामपंचायतीची भव्य इमारत उभारण्यात आली. तसेच कचरा प्रकल्पासाठी तत्वतः मान्यता मिळवून जागा खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे खेर्डी औद्योगिक वसाहती मधील अनेक वर्षांचा थकीत कर वसूल करण्यात सर्वांच्या सहकार्याने यश मिळाले, ही बाब आपल्या कारकिर्दीत जमेची ठरली आहे.
सर्वात म्हणजे गावाचा विकास करत असताना डेव्हलपमेंटला सरसकट परवानगी देत चाललो आहोत. मात्र याकडे काही बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे काही उदाहरणे देऊन निदर्शनास आणून दिले. खेर्डी गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गावाचा विकासात्मक प्लॅन असणे आवश्यक आहे. आपल्या दृष्टीने खेर्डी औद्योगिक वसाहतीतील रिकाम्या असलेल्या भूखंडाच्या ठिकाणी सुसज्ज क्रिडांगण व अद्ययावत बगीचा व सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मानस आहे. यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. तसेच यासाठीचा अधिकचा निधी सरकारकडून आणताना मोठी मदत होईल असे आपले मत शेवटी प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.