खेड (दिलीप जाधव) – उघड्यावर रासायनिक सांडपाणी सोडून सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांच्या चांगलाच अंगलट आला आहे. मुंबई येथून आलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घातक रसायन फेकणाऱ्या योजना इंडस्ट्रिज आणि वनविड या दोन रासायनिक कारखान्यांनसह आणखी दोन रासायनिक कारखान्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई केली आहे. तर एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चव्हाण यांनी दिली.
लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मासेमारी संपुष्टात आल्याने मच्छिमारांच्या उदरनिवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वायु प्रदुषणामुळे आंबा, काजू यासारख्या नगदी पिक्यांची पुरती वाट लागली आहे. हे कमी की काय म्हणून काही कारखानदार घातक सांडपाणी रस्त्यालगतच्या नाल्यांमध्ये सोडून परिसरातील जनतेच्या जिवाशी खेळू लागले आहेत.
गेल्या महिन्यात आवाशी फाट्यानजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणाऱ्या दोन टँकरचालकांना येथील ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्यानंतर योजना इंडस्ट्रिज आणि वनविड या दोन कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला उत्पादन बंदची कारवाई करावी लागली होती. दरम्यान प्रदुषणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला धडक देत आंदोलनाचा इशारा दिला.
प्रदुषणाच्या प्रश्नावर स्थानिकांनी उग्र आंदोलनाचा पवित्रा घेताच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील दोन पथकांनी लोटे औद्योगिक वसाहतीतीला अचानक भेट देवून येथील घरडा, एक्सल, पुष्कर यासारख्या काही मोठ्या रासायनिक कारखान्यांच्या तपासणी सुरू केली. दोन दिवस कसून तपासणी झाल्यानंतर रस्त्यालगतच्या नाल्यात घातक रसायन फेकणाऱ्या योजना इंडस्ट्रिज, वनविड या दोन रासायनिक कारखान्यांसह सातत्याने प्रदुषण करणाऱ्या श्रेयस इंटरमिजियट आणि हरीश्री या दोन कारखान्यांनाही उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. तर लासा सुपरजेनेरिक या रासायनिक कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली.
प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई पथकाने केलेल्या या कारवाईमुळे रासायनिक कारखान्यांच्या प्रदुषणामुळे जिवंतपणीच नरक यातना भोगणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हे करत असताना जी कारवाई मुंबई येथील पथकाने येऊन केली ती कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील अधिकाऱ्यांना का करता आली नाही असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.