गुहागर – गेले सुमारे दीड वर्ष शृंगारतळी- गुहागर मार्गावरील मोडाकाआगर पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने हा मार्ग पूर्णतः बंद झाल्याने गुहागरकडे जाणारी सर्व वाहने पालपेणे- पवारसाखरी – रानवीमार्गे गुहागरला जात येत होती. मात्र, प्रवाशांची ही फरफट पाहून वरवेली ग्रामस्थांनी आता स्वतः खर्च करून दूर केली आहे. या ग्रामस्थांनी पाटपन्हाळे -वरवेली हा रस्ता तयार केला असून त्यामुळे प्रवाशांचे १० कि. मी. अंतर कमी झाले आहे.
मोडकाआगर येथील धरणामध्ये असलेला पूल या दोन्ही भागांना जोडतो. सुमारे दीड वर्षपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने प्रशासनाने हा पूर्ण मार्गच बंद केला.शृंगारतळी बाजारपेठेपासून मोडकाआगर पर्यंत संपूर्ण वाहतूक आजतागायत बंद आहे. या पुलाचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, पुलाच्या बांधकामांवर धरणाचे पाणी आल्यामुळे काम रखडले आहे. पुलाच्या कामामुळे गुहागर – आरे -रानवी – पवारसाखरी-पालपेणेमार्गे शृंगारतळी असा २२ कि.मी.प्रवासाचा वळसा पडायचा व हा त्रास गेली दीड वर्षे सुरू आहे. या वर उपाययोजना करताना सिद्धीविनायक मंडळ मराठवाडी वरवेली या मंडळाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा पर्यायी मार्ग करण्याचे काम हाती घेतले व तो पूर्ण करूनही दाखविले. या कामासाठी सुमारे साडे चार लाख रुपये ग्रामस्थांनी खर्च केले आहेत. कोणत्याही शासकीय निधी शिवाय ग्रामस्थांनी वर्गणी काढून हा खर्च केला.त्यामुळे आता अवजड वाहने सोडून सर्व वाहने या रस्त्यावरून जाऊ लागली आहेत. सिद्धीविनायक मंडळ, मराठवाडी मंडळाचे अध्यक्ष आशिष विचारे, दादा विचारे, जितू विचारे, सुधीर विचारे, संतोष देसाई, मकरंद विचारे, बंटी शिंदे, सुबोध विचारे, शेखर विचारे या कार्यकर्त्यांनी हा रस्ता बनविण्यास मदत केली.