चिपळूण_ चिपळूण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी एक हजाराचा टप्पा गाठला. यामध्ये 300 कोरोना बाधित सध्या उपचार घेत असून आतापर्यंत कोरोनामुळे 30 जणांचा बळी गेला आहे. जुने आजार आणि कोरोनाचे उशिरा निदान यामुळे चिपळूणात कोरोनाग्रस्त रूग्ण दगावत आहेत. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घेतल्यास मृत्युदर कमी करता येईल. अशी माहिती कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप यांनी सांगितले.
चिपळूणात एकूण 1 हजार 6 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यातील 300 रूग्ण उपचार घेत आहेत. तर 676 रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत. 30 जणांचा मृत्यु झाला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.20 टक्के असले तरी कोरोनाच्या विळख्यात सापडणार्यांमध्ये 31 ते 40 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या अधिक आहे. 51 ते 60 वयोगटातील बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यु दरात रत्नागिरीनंतर चिपळूण तालुक्याचा क्रमांक लागत आहे.
