देवरुख – देवरुख बाजारपेठ 27 तारखेपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारीनी घेतला असेल तर तो त्यांचा विषय आहे,मात्र सर्वसामान्य माणसाच्या रोजीरोटीवर परिणाम होईल असा कोणताही निर्णय यापुढे स्थानिक पातळीवर नको अशी ठाम भूमिका गाव विकास समितीच्या सौ अनघा कांगणे यांनी घेतली आहे.
कोरोना रुग्ण वाढत असल्याचे कारण देत खबरदारीचा उपाय म्हणून लॉक डाऊन करायचाच होता. तर तो आताच करायला हवा होता. आता बाजारपेठ सुरू असल्याने गर्दी होणार आहे.आठ दिवस नंतर गर्दी कमी झाल्यानंतर होणारा लॉक डाऊन नेमका कशासाठी ? असा खरमरीत सवाल गाव विकास समितीच्या सौ अनघा कांगणे यांनी याबाबत नगरपंचायत आणि लॉक डाऊन चा निर्णय घेणाऱ्यांना विचारला आहे.
व्यापारी त्यांची दुकाने आठ दिवस बंद ठेवणार असतील तर त्यांनी ती जरूर ठेवावीत,तो त्यांचा विषय आहे. मात्र 27 तारखेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामावर जाण्यास,प्रवास करण्यास कोणतीही बंधने नकोत अशी भूमिका सौ अनघा कांगणे यांनी मांडली आहे.पुन्हा लॉक डाऊन केल्याने सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होऊ शकते.आता कुठे सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत झाले आहे त्यावर पुन्हा कुणीही बंधने आणू नयेत असे अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.व्यापारी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवणार असतील तर तो त्यांचा पुरता मर्यादित विषय असायला हवा.आठ दिवस गणपती मध्ये बाजारपेठ गर्दीने भरलेली असताना त्यानंतर बंद पाळून कोरोना चेन कशी तुटणार आहे हे तज्ञ सांगू शकतील मात्र सर्व सामान्य माणसाला त्रास होईल अशी कोणतीही भूमिका यापुढे घेतली जाऊ नये असे गाव विकास समितीच्या सौ.अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.
