चिपळूण – भारतीय जनता पार्टीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या महिलांच्या हक्काच्या नेत्या निलम गोंधळी यांची भाजपा महिला राज्यउपाध्यक्षा पदी वर्णी लागली आहे. निलम गोंधळी यांच्या निवडीने पक्षसंघटन अधिक बळकट होईल अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षं सक्रिय असणाऱ्या निलम गोंधळी यांचा कोकणात जनसंपर्क उत्तम आहे.शिवाय तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत त्यांची आपुलकीची नाळ जोडलेली आहे. सतत दोन वेळा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या गोंधळी यांनी १९९२ साली स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून आपल्या समाजकार्याला सुरवात केली. भाजपाच्या महिला सचिव असतांनाही त्यांनी महिलांना अनेक विषयात न्याय मिळवून देण्याची मुख्य भूमिका पार पाडली. आज पर्यंत भाजपामध्ये मिळालेल्या विविध पदांचा मान राखीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे काढत पक्षवाढीसाठी रान उठवले होते. पक्षासाठी गोंधळी यांचे वेळोवेळी मौलाचे योगदान राहिले आहे.गोंधळी यांच्या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याच्या निवडीमुळे जिल्ह्यात पक्षसंघटन वाढीस मोठा उपयोग होईल असे सतीश मोरे म्हणाले.जिल्हापरिषद बालकल्याण सभापती म्हणून काम करीत असतांना गोंधळी यांची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.जिल्ह्यातील विविध समस्या बाबत त्यांचे शासनदरबारी सतत प्रयत्न सुरू असतात.
