पोलादपूर – गुहागर तालुक्यातील सुंकाई कंपनीची पिंपळेश्वर ही आराम बस आज विरारा ते गुहागर येत असताना या बसच्या चालत्या गाडीतुन सामानाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणगावजवळ मध्यरात्रीच्यावेळी हि घटना घडली घाटात गाडीचा वेग कमी झाला असता चालत्या बसच्या डिकी मधुन सुमारे पंन्नास हजार रुपये किंमतीचे सामान चोरले आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या कशेडी घाटात बसचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत हि चोरी झाली. त्याचवेळी बस मधील काही प्रवाशांच्या ही चोरीची हि घटना लक्षात येताच त्यांनी बस थांबवली. सदर प्रकरणी पोलादपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या बसेस ना कशेडी घाटात लुटण्याचा प्रकार धक्कादायक आहे.
कोकणाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी खाजगी बसने व खाजगी वाहनाने येत आहेत. त्यामुळे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. आता कशेडी घाटात पोलिसांनीही अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विरार ते गुहागर अशी प्रवासी वाहतूक करणारी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची लक्झरीबस (क्र.एमएच9473) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घाटातील एका वळणावर एका प्रवाशाला कोणी अज्ञात व्यक्ती डाव्याबाजूच्या डिकीतील प्रवाशांचे सामान काढून रस्त्यावर टाकत असून अन्य व्यक्ती उचलून नेत असल्याचे दिसून आले. यावेळी सदर प्रवाशाने लक्झरी चालकाला ही घटना सांगून बस थांबायला लावली असता मागील अज्ञात वाहनांतून सदरचे सामान गोळा करून काही अज्ञात व्यक्ती पसार झाल्या. या गुन्ह्यांत आरोपींनी आठ प्रवाशांचे सुमारे 24 हजार 500 रूपये किंमतीचे घरगुती वापराचे कपडे, चीजवस्तु, रोख रक्कम तसेच गणपतीच्या डेकोरेशनचे सामान असलेल्या बॅगा चोरीस गेल्या आहेत. यामुळे अनेक प्रवाशांनी गणेशोत्सवाला गावी पोहोचल्यानंतर 10 दिवस क्वारंटाईन होण्यासाठी घेतलेले कपडे व सामान चोरीस गेल्याने त्यांची तारांबळ उडाली असून रात्रभर पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये खोळंबा झाल्याने प्रवाशांची चिडचिड वाढल्याचे दिसून आले. यासंदर्भात सुनील शंकर दामले (35,साक्री,ता.गुहागर,जि.रत्नागिरी) या लक्झरी चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा र.नं.42-2020 भा.दं.वि.379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव अधिक तपास करीत आहेत. पोलादपूरच्या गुन्हेगारी इतिहासात प्रथमच चालत्या लक्झरीबसमध्ये चोरी झाल्याने आगामी काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अशा प्रकारच्या गुन्हेगारीची शक्यता वाढीस लागली आहे.