बातम्या शेअर करा


शृंगारतळी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शृंगारतळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गुहागर पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याच वाहतूक नियमनाच्या काळात ‘भावेश’ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कथित दबंग वर्तनाची चर्चा सध्या शृंगारतळी परिसरात रंगली आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्य बजावत असताना संबंधित पोलीस कर्मचारी हा आवेश मध्ये येऊन सर्वसामान्य वाहनचालकांशी आक्रमक पद्धतीने वागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. चालू वाहनामध्ये बसलेल्या चालकांनाही दंडात्मक कारवाईची धमकी दिली जात असल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या काही वडाप वाहनांवर मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नियम पाळणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांवरच कठोरपणा आणि वाहतुकीला प्रत्यक्ष अडथळा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्याला नक्की दंड कोणत्या कारणासाठी केला जातो. याची पूर्णपणे माहिती आहे की नाही याची चर्चाही जोरदारपणे रंगू लागली आहे.गणेशोत्सवाच्या काळात शृंगारतळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत तेवढ्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी कठोरपणे कारवाई करणे आवश्यक असले तरी कारवाई करताना नागरिकांशी संयमाने आणि सन्मानाने वागणेही तितकेच गरजेचे आहे.
‘वर्दीचा अधिकार की नागरिकांवर दबाव?’
संबंधित पोलीस कर्मचारी भावेश हे गुहागर तालुक्यातीलच असल्याची चर्चा असून, स्थानिक असल्याचा आणि पोलीस वर्दीचा आधार घेत दबंगपणे वागत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे..गुहागर पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी यापूर्वी वाहतूक कोंडीच्या काळात नागरिकांशी समन्वय साधून परिस्थिती हाताळली आहे. नागरिकांमध्ये मिसळून, आपुलकीने आणि आवश्यक त्या ठिकाणी कायद्याचा योग्य वापर करून वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस कर्मचारीही आपले कर्तव्य बजावत आहेत.त्यामुळे एका कर्मचाऱ्याच्या कथित वर्तनामुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाबाबत गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासणे गरजेचे आहे.
वरिष्ठांनी भावेशच्या वर्तनाची दखल घ्यावी
शृंगारतळीतील नागरिकांमध्ये चर्चेत असलेल्या पोलीस कर्मचारी भावेश यांच्या कथित वर्तनाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी, तसेच वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना सर्व वाहनचालकांसाठी समान निकष ठेवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक कोंडी दूर करा; पण नागरिकांवर दबाव नको! गणेशोत्सवाच्या काळात शृंगारतळीतील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध ठेवतानाच नागरिकांशी सन्मानाने वागण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here