महसूल विभागाच्या कार्याचे आ. भास्कर जाधव यांच्याकडून कौतुक; योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

0
2
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात आमदार भास्कर जाधव यांनी महसूल विभागाच्या कार्याचे कौतुक करत नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाची गती वाढविणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूल विभाग हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक असून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात या विभागाची मोठी भूमिका आहे. गावागावात पोहोचलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या साधनांचा सकारात्मक वापर करून नागरिकांनी आपली कामे अधिक सुलभ करावीत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी मच्छिमारांच्या घराखालच्या जमिनींचा विषय, फळपीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत असल्याचे नमूद केले.
तर मतदारसंघातील अधिकारी जनतेच्या कामासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, “माझ्या मतदारसंघात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मी हस्तक्षेप करत नाही. जनतेची कामे वेळेत आणि प्रामाणिकपणे होणे, हाच आमचा उद्देश आहे,” असे स्पष्ट मतही आ. जाधव यांनी व्यक्त केले. महसूल समाधान शिबिरातून विविध दाखल्यांचे वितरण करून नागरिकांना जागेवरच सेवा देण्यात आली. पूजा मंगल कार्यालयात आयोजित या शिबिरात पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, नगराध्यक्षा निता मालप, जिल्हा परिषद कृषी समिती सभापती महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, नेत्रा ठाकूर, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार परीक्षित पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here