चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील एका पालकाने आपल्या मुलाला शाळेत विनाकारण डांबून ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित शाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारदार इम्रान रफीक घारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचा मुलगा सुफियान इम्रान घारे हा चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. मात्र शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थ्याला तब्बल एक ते दोन तास शाळेतच थांबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पालकांनी याबाबत वारंवार शाळेच्या वर्गशिक्षिका आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधून मुलाला वेळेवर घरी सोडण्याची विनंती केली. मात्र “मुख्याध्यापकांच्या आदेशामुळे त्याला आधी सोडता येणार नाही,” असे उत्तर देत विद्यार्थ्याला शाळेतच थांबवले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून तो प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचा दावा पालकांनी केला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्याला डांबून ठेवणे ही गंभीर बाब असून, यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षक व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

















