शृंगारतळी : गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळी येथे सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वडाप वाहनांमुळेच मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शृंगारतळी येथून चिपळूण, आबलोली, पालशेत, तळवली, पवारसाखरी आणि नरवण या भागांत प्रवासी वाहतूक करणारी वडाप वाहने दिवसभर मुख्य बाजारपेठेत एका रांगेत उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी इतर वाहनचालकांना पार्किंगसाठी जागाच मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या नागरिकाने बाजारपेठेत वाहन पार्क करण्याचा प्रयत्न केला तर काही वडाप चालकांकडून दादागिरीची भाषा वापरून वाहन हटवण्यास सांगितले जाते. त्यामुळे सामान्य वाहनचालकांमध्ये नाराजी वाढत आहे.
रात्रीच्या वेळीही गुहागर तालुक्यातून मुंबई आणि ठाणे येथे जाणाऱ्या खाजगी आराम बसेस बाजारपेठेत अडथळा निर्माण करून उभ्या राहत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार आहे. संबंधित वाहनचालकांनाही योग्य ती समज द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
रस्ता रुंदीकरणानंतर वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र वाढती वाहने, अनियमित पार्किंग आणि बाजारपेठेतील गर्दी यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे चित्र आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही, तर रस्ता ओलांडतानाही जीव मुठीत धरावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे येथे पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रणाबाबत प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू आहे. “सामान्य वाहनांना शिट्ट्या, पण वडापवाल्यांना मोकळीक,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया काही वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येमुळे शृंगारतळी बाजारपेठेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहतूक पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.वडाप वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी एखादे मैदान किंवा एखादे ठिकाण नेमून द्यावेत अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
















