चिपळूण – चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिपळूणच्या पत्रकारांनी दिला आहे.
बुधवार दि.२५ रोजी चिपळूणमधील एका पतसंस्थेच्या विरोधात शहरातील बहादूरशेख नाका येथे काहीजण उपोषणास बसणार होते त्याचे वृतांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांना काही लोकांनी बेदम मारहाण करून मोबाईल सह साहित्याची चोरी केली अशी तक्रार पोलिसात दाखल आहे. हा सर्व प्रकार उपस्थित अनेकांनी मोबाईलवर शूट केला ज्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्लेखोरांना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले मात्र आज पाचवा दिवस उजाडला तरी संशयित आरोपींना अटक करण्यात आली नाही. यामुळे चिपळूणचे पत्रकार संतप्त झाले असून येत्या चार दिवसात हल्लेखोरांना अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा येथे झालेल्या बैठकीत पत्रकारांनी दिला आहे.
चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, 2017 अन्वये ज्यामध्ये गंभीर (cognizable) आणि अजामीनपात्र (non-bailable) गुन्हा आहे, गुन्हा दाखल केला असला तरी जी कारवाई त्वरित करायला पाहिजे ती करण्यास टाळाटाळ होत असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. अशा गुन्ह्यात प्राथमिक तपासणी करून आरोपीना तात्काळ ताब्यात घ्यायचे आहे. सोशल मीडियाद्वारे घटनेची चित्रफीत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली ज्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. तरीही पोलीस विलंब करत आहेत. यामुळे येथील पत्रकारांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले असून ४ दिवसात संबंधितांना अटक झाली नाही तर प्रथम शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे.त्यानंतर या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येणार आहे असा निर्णय पत्रकारांच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारच्या घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्रकारांवर हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे तर लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला मानला जातो. त्यामुळे पोलिसांनी तातडीने, निष्पक्ष आणि कडक कारवाई करणे बंधनकारक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाच जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.















