खेड – ( प्रसाद गांधी ) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या कोकणवासियांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत. खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे बोरिवलीहून सापिर्ली गावाकडे येणारी खासगी आराम बस पलटी झाल्याने या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोरिवली येथून सापिर्ली व धामणंद परिसरातील नागरिक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गावी येत होते. ही खासगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.या बसमध्ये एकूण २८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. बसची समोरील काच फोडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
















