खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर आज एक धक्कादायक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ धावत्या वॅगनार कारने अचानक भीषण आग पकडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
चिपळूणच्या दिशेने ही कार जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. चालकाला काही समजण्याआधीच कारने पेट घेतला आणि काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण वाहनाला वेढा घातला. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की अवघ्या काही मिनिटांत कार पूर्णपणे जळून खाक झाली. प्रसंगावधान राखत चालकाने जळत्या कारमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र या प्रयत्नात तो गंभीररित्या भाजला असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आगीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली.
















