भाजप हा कागदावरचा बलाढ्य पक्ष – परिमल भोसले ,जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी चार कामे करून दाखवण्याचे खुले आव्हान.?

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – भाजप हा कागदावरचा बलाढ्य पक्ष आहे. भाजपत सध्या काम कमी आणि फोटोसेशन, रील्स बनविण्याचेच अधिक उद्योग पाहायला मिळत आहेत. गलिच्छ व सूडबुद्धीचे राजकारण सुरु आहे. चार महिन्यांपूर्वी आम्ही पक्षाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिलेला असताना व पक्षात सक्रीय नसतानाही उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आमच्यावर निलंबन व हकालपट्टीची कारवाई केली. मुळात आम्ही दक्षिण रत्नागिरीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असताना उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांना आमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार दिला कुणी? कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ही कारवाई केली? हे येत्या आठ दिवसांत त्यांनी स्पष्ट करावे, अन्यथा त्याच्यासह अन्य काहींची पुराव्यानिशी खोटारडेपणाची पोलखोल केली जाईल, असा थेट इशारा भाजपचे माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी दिला. तर जिल्हाध्यक्ष मोरे यांना ‘चार कामे’ मार्गी लावून दाखविण्याचे खुले आव्हानही दिले.


चिपळूण शासकीय विश्रामगृहात माजी नगरसेवक व भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष परिमल भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप अध्यक्ष सतीश मोरे यांच्यावर आसूड ओढले. नुकत्याच नगर पालिकेच्या पार पडलेल्या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी माजी नगरसेवक परिमल भोसले यांचे पक्षातून निलंबन केल्याची घोषणा केली. मात्र या कारवाईनंतर आज पत्रकार परिषदेत परिमल भोसले यांनी जिल्हाध्यक्षांवर आणि स्थानिक पक्षनेतृत्वावर गंभीर करून आरोपांची सरबत्ती केली.
“राजीनामा दिला, मग निलंबन कसले?”
परिमल भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 15 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. “राजीनामा दिल्यानंतर चार महिन्यांनी निलंबनाची कारवाई कशी काय होते? अजूनही मला निलंबनाचे अधिकृत पत्र मिळालेले नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भोसले म्हणाले की, 2018 साली निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. “2018 ते 2025 या काळात आम्ही एकनिष्ठेने पक्षासाठी काम केले. सत्ता नसताना रस्त्यावर उतरून आंदोलन केली, पाच राजकीय गुन्हे अंगावर घेतले,” असे त्यांनी नमूद केले.
“सूडबुद्धीचे राजकारण सुरू”
जिल्हाध्यक्षांवर टीका करताना भोसले यांनी “ही कारवाई सूडबुद्धीने केलेली आहे” असा आरोप केला. “लांजा, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी येथे भाजपचेच काही पदाधिकारी अपक्ष लढले, त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? फक्त आमच्यावरच का?” असा थेट सवाल त्यांनी केला. भाजप पक्षाची विचारधारा चांगली आहे. मात्र स्थानिक ठिकाणी आज पक्षात काम कमी आणि फोटोसेशन-रील्स जास्त सुरू आहे. कमळ लावलं म्हणजे कोणी निष्ठावंत होत नाही. जिल्ह्यात भाजपची स्वबळावर निवडून येण्याची ताकद नाही.
तरीही जिल्हाध्यक्ष स्वतःला किंगमेकर समजतात. आताच्या निवडणुकीतही दापोली, खेड येथे स्वबळावर लढताना भाजपची काय अवस्था झाली ते पाहिले. चिपळूण, रत्नागिरी मध्ये युतीच्या माध्यमातून उमेदवार निवडून आले. याचाच अर्थ भाजप कागदावर चालणारा पक्ष असून फक्त कमळ छातीवर लावून मिरवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फुगीर भरतीच्या माध्यमातून पक्षात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महापूर येऊ लागला आहे. यात खरा निष्ठावंत पदाधिकारी बाजूला सरकू लागला आहे. भाजप पक्षात आठ वर्षे आम्ही निष्ठेने काम करत आहोत. आमच्यावर पक्षासाठी तीन चार गुन्हे दाखल झाले आहेत, परंतु जिल्हाध्यक्षांवर एकतरी गुन्हा दाखल झाल्याचे दाखवून द्यावे. हे पक्षासाठी कधी रस्त्यावर उतरलेच नाहीत तर गुन्हे दाखल कसे होतील. भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस मंदार कदम याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख करत भोसले यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “अशा गंभीर प्रकरणात कारवाई का झाली नाही? कोणत्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून संरक्षण दिलं जातंय?” असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी पुरावे सादर करण्याचा इशाराही दिला.तसेच जिल्हाध्यक्षांना आठ दिवसांची मुदत देत चार कामे मार्गी लावण्याचे खुले आव्हान दिले तसेच “आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्यावर पुन्हा आरोप झाले तर आम्ही पुराव्यानिशी पोलखोल करू. अॅक्शनला रिऍक्शन देणारच, असा रोखठोक इशारा देत ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असा डायलॉगही भोसले यांनी यावेळी मारला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here