चिपळूण – वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी महोत्सवातून कोकणाच्या बदलत्या चित्राचे दर्शन घडत असून, “कोकण आता गरीब व मागासलेला राहिलेला नाही, तर प्रगतीकडे वेगाने झेप घेत आहे” असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. कृषी महोत्सव पाहून आपण भारावून गेलो असल्याचे सांगत, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या कार्याचे त्यांनी शब्दातीत कौतुक केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी महोत्सवाचे तसेच भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन खा. नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्या समवेत सौ. निलम राणे, चिपळूण नागरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अनिरुद्ध निकम, चिपळूण नागरीच्या संचालिका ॲड. नयना पवार तसेच शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी केले.
कोकणाच्या क्षमतेची जाणीव करून देणारे प्रदर्शन
खा. राणे म्हणाले की, कोकणाकडे अनेक वर्षे दुर्लक्षित व मागासलेला भाग म्हणून पाहिले जात होते. रोजगारासाठी मुंबई, पुणे अशा शहरांकडे धाव घेणारा कोकणी तरुण हेच वास्तव होते. मात्र, वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवाने हे चित्र बदलत असल्याचे स्पष्ट दिसते. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा, मासेमारी, आंबा, काजू, नारळ, फणस, करवंद, आवळा, जांभूळ अशा बागायती पिकांसह डोंगरदऱ्यांमधील मौल्यवान वनौषधी वनस्पतींचा योग्य वापर झाला, तर कोकण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
चांगल्याचे कौतुक करा, अनुकरण करा!
“कोकणी माणसाची सवय आहे की चांगल्याचे कौतुक करायचे नाही. मात्र, आता तरी चांगल्या उपक्रमांचे अनुकरण करा,” असे सांगत खा. राणे यांनी गोपालन, दुग्धव्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. युरोपातील देश दुग्धव्यवसायावर समृद्ध झाले असून, कोकणातही मुबलक पावसामुळे शेती व पशुपालनाच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून पुढील पिढी डॉक्टर, इंजिनियर, आयएएस-आयपीएस अधिकारी तसेच यशस्वी उद्योजक बनू शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प उभारताना कोकणातील शेतकरी, युवक व महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय असल्याचे सांगत, हा प्रकल्प कोकणासाठी आदर्श ठरल्याचे खा. राणे म्हणाले. कृषी महोत्सव केवळ पाहण्यासाठी नव्हे, तर त्यातून प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा संकल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले असून, रत्नागिरी जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी आपण नक्कीच पार पाडू, असा निर्धार खा. राणे यांनी व्यक्त केला. यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मनोगत व्यक्त करत कृषी महोत्सवाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.
















