चिपळूण – चिपळूण -कराड राष्ट्रीय मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. या भागातील सोनपात्रा परिसरातील अवघड वळण तर मृत्यूचा सापळाच बनला आहे. घाटातील या चढ -उताराच्या वळणावर मोठ-मोठे खड्डे पडले असून दरदिवशी या ठिकाणी मालवाहू ट्रक, कंटेनर व टँकर पलटी होण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. शुक्रवारी सकाळी या भागात एक टँकर पलटी झाल्याने या मार्गावरची अवजड वाहतूक ठप्प झाली होती.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला कुंभार्ली घाट मार्ग आता ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. या मार्गावर सोनपात्रा येथील चड-उताराच्या तीव्र वळणावरच मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात वाहने अडकून पलटी होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळीही या ठिकाणी टँकर पलटी होऊन अपघात झाला. त्यामुळे कुंभार्ली घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीला जागा नसल्याने अवजड वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतरही संबंधित विभाग झोपेतच आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
















