रत्नागिरी -गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना किंवा इतर कोणालाही विनापास किंवा विनापरवाना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सरकारच्या आदेशाप्रमाणे 14 दिवसांचाच क्वॉरंटाइन काळ असून प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी ते गरजेचे आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी गावी येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर मुंबई – गोवा महामार्गवर कशेडी घाटातील चेकपोस्टवर चाकरमान्यांच्या वाहनांची रांग लागली आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत. कोकणात परतल्यावर किती दिवस क्वॉरंटाइन रहायचे, याबाबतही चाकरमान्यांमध्ये संभ्रम होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भूमिका स्पष्ट केली आहे. चाकरमान्यांना क्वॉरंटाईन होण्याबाबत सरकारचे याआधीचेच नियम कायम असून जिल्ह्यात परतणाऱ्यांना 14 दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी कायम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.