चिपळूण — चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिष्टी डेअरी प्रकल्पाची उभारणी झाली. हा प्रकल्प आता शेतकऱ्यांसाठी रोजगार वाहिनी ठरत आहे. या प्रकल्पाशी सुमारे १५ हजार शेतकरी जोडले गेले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील २२८ लोकांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळाली आहे. तसेच शॉपी, दूध संकलन केंद्र, वाहने, कच्चा माल खरेदी उद्योजक याद्वारे सुमारे २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूणच रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभे करताना त्यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध कसे करता येईल, या विचाराने सुभाषराव चव्हाण स्वस्थ कधीच बसले नाहीत. शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाची उभारणी करायची झाली तर त्यांच्या उत्पादनांसाठी ठोस बाजारपेठ देखील उभी करावी लागेल. यातूनच वाशिष्ठी डेअरीच्या उभारणीची संकल्पना पुढे आली आणि हा प्रकल्प अल्पावधीतच प्रत्यक्ष साकारला गेला. विशेष म्हणजे हा प्रकल्प आता कोकणवासियांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
याबाबत माहिती देतांना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून दररोज ५५ हजार लिटर दुध संकलित होत आहे. यामध्ये ३५ हजार लिटर दुध पॅकिंग करून विक्रीसाठी तर २० हजार लिटर दुध दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी वापरले जात आहे. दूध संकलन चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, संगमेश्वर येथून होत आहे. या प्रकल्पाच्या ११ बीएमसी आहेत. मालघर, पिंपळी, दापोली, आंबडस, वेरळ, खेरशेत, वनौशी, दस्तुरी, करंजाडी, महाड, खंडाळा येथे आहेत. तर संकलन केंद्र ७८ असून या माध्यमातून १५ हजार शेतकरी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची जोडले गेले आहेत विशेष म्हणजे शेतकऱ्यांना दूध संकलनाचे बिल दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असून सुमारे २ कोटी रुपयांचे बिल अदा होत आहे. तर महिन्याकाठी सुमारे पावणे सहा कोटी बिल होत असल्याची माहिती प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या ७८ शॉपी, वितरक १६७, विक्रेते १७ हजार ६२० असून वितरण व्यवस्था मुंबई, ठाणे, घाटकोपर, रायगड जिल्ह्यात नागोठणे, महाड, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, मंडणगड, दापोली, हर्णे, लोटे, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, सातारा जिल्ह्यात कोयना नगर, पाटण, कराड, सातारा, पुणे, अहिल्यानगर इथपर्यंत पोहोचवण्यात या प्रकल्पाला यश आले आहे. यामुळे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या दुधासह दुग्धजन्य पदार्थाची चव ग्राहकांना चाखता येत आहे. विशेष म्हणजे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत, अशी माहिती प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी दिली.
या प्रकल्पामुळे शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली असल्याने शेतकऱ्यांना हक्काचे अर्थाजन मिळाले आहे. तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय, शॉपी, दूध संकलन केंद्र, वाहने कच्चा माल खरेदी या माध्यमातून मोठी रोजगाराची संधी सुशिक्षित तरुण तरुणी तसेच महिलांना मिळाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण रोजगार उभा करू शकलो याचे समाधान आहे, अशा शब्दांत प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी आपली भावना शेवटी व्यक्त केली.