खेड – खेड तालुक्यातील खोपी गावातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची चार घरे या ठिकाणी लागलेल्या वणव्यात जळून खाक झाली. गेल्या अनेक वर्षापासून या वाडीत पाणी व रस्ता नसल्याने काही कुटूंबे उन्हाळ्यात पाण्याच्या जवळ स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे आग लागली तेव्हा घरांमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
या लागलेल्या वणव्याच्या आगीत पार्वती बबन ढेबे, रंजना लक्ष्मण ढेबे, लक्ष्मी जानू ढेबे, मोहन जानू ढेबे यांची घरे जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या सर्वांच्या घरातील धान्य, भांडी व कपडे जळून खाक झाल्याने चार कुटुंबे बेघर झाली आहेत. तरी या सर्व बांधवांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केली आहे.