चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकदा पाच वाहनांचा अपघात घडला आहे. एकाच ठिकाणी पाच वाहने एकमेकांवर आदळून अपघात घडला आहे. या अपघातात घरडा कंपनीच्या बसचा समावेश असून यामधील पंधरा ते वीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर घाटात दोन तास वाहतूक बंद झाली होती.
मुंबई गोवा महामार्गाव परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षणभिंत कोसळली आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सूरु आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात बस एकेरी मार्गावर जात असताना समोरून मुबईच्या दिशेने कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस लावलेल्या गर्डरवर जाऊन आदळली. तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार होती आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या गेल्या. घरडा कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी यामध्ये जखमी झाले आहेत. किमान पंधरा ते वीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर चिपळूण पोलीस महामार्ग पोलीस यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. या घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. या ठिकाणी अपघाताच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तर याच ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.