रत्नागिरी – सध्या रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाला असला तरी वर्ग-३, वर्ग-४ कर्मचाऱ्यांची पदे दिवसेंदिवस रिक्त होत चालली आहेत.
सुमारे ४०८ पदे सध्या रिक्त आहेत त्यामुळे कामकाज चालवताना आरोग्य विभागाचे आरोग्य अडचणीत आले आहे. गतवर्षी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर गेली होती मात्र त्याला पर्याय म्हणून कंत्राटी तत्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हास्तरावर भरती करण्याचा निर्णय झाला. शासनाने ४० हजार रुपये मानधनावर तद्रथ नियुक्ती करण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाला दिले.जिल्हा परिषदेची ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी अशी १४० पदे मंजूर होती ती सर्वच्या सर्व भरलेले आहेत. परंतु वर्ग-३ ची ३३७ आणि वर्ग-४ ची संवर्गातील ७२ पदे रिक्त असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षात नव्याने भरती न झाल्याने सेवानिवृत्त वाढत आहे. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, परिचर हे कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात तर रुग्णाला अन्यसेवा देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर असते. पायाच डळमळायला लागल्याने आरोग्यसेवा देताना तारेवरची कसरत करावी लागते. सगळ्याच आरोग्य केंद्रात ही परिस्थिती आहे. दुर्गम गावांमध्ये त्याचा अधिक फटका बसतोय. सेवानिवृत्त पद रिक्त झाल्याने तेथे नियुक्ती कशी द्यायची असा प्रश्न तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना पडतो. रिक्त पदांची भरती लवकर होणार आहे ही भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे.