मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली मुदत उद्या संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी उद्या कारवाई होणार काय, याबाबतची माहिती दिली आहे.अनिल परब यांनी आपण कर्मचाऱ्यांवरील कारवाईवर ठाम असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आतापर्यंत सातवेळा अल्टीमेटम दिला गेला आहे. मात्र, प्रशासन फक्त अल्टीमेटम देतंय आणि कारवाई करणार नाही, असा त्यांचा समज झालाय. मात्र, आज रात्री अखेरपर्यंत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर उद्या नक्कीच कारवाई होणार आहे. यामध्ये त्यांचं निलंबन असेल, बडतर्फी असेल किंवा सेवासमाप्ती असेल.
पुढे ते म्हणाले की, सध्या पाच हजार बसेस सुरु आहेत. आधी बारा हजार सुरु होत्या. पण आता उपलब्ध कर्मचाऱ्यांसह आम्ही काम सुरु करतो आहे. याशिवाय अकरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही करतोय. तसेच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाई करणार आहोत. उद्यापासून जे येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं दिसतंय. जे पाच महिने आले नाहीयेत. ते कोणतंही कारण न देता गैरहजर आहेत, त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत. म्हणून आम्ही ही कारवाई करणार आहोत.