राजकारण इतक्या हीन पातळीवर पोहोचले आहे की या सर्व प्रकारच्या लढाई त सामाजिक भान,समाजहित यांना चुड लागलेली दिसते! स्त्री सन्मान,स्त्री दाक्षिण्य तर पार दिल्लीच्या खुंटीला टांगण्याची चढाओढ लागलेली दिसते!
कशाचेच भान राहिलेले दिसत नाही! राजकारणात कोण साव आणि कोण चोर आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत काही खरं नसत! हमाम मे सब नंगे होते है, हा प्रख्यात डायलॉग राजकारण लागू पडतो! पण आता हे नंगे पण इतकं वाढलंय की तो हमामच गढूळ होऊ लागलाय ! मुळात आपण काय करतोय आपण काय बोलतोय याच भान कुणालाही राहिलेली दिसत नाही! सत्ता, खुर्ची, पैसा आदिच्या जोरावर वर्चस्व मिळवण्यासाठी चाललेली लढाई महासंग्राम होणार असे दिसते !
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सत्तेतून बाहेर जावी , म्हणून विरोधी पक्ष भाजपा ज्याप्रकारे केवळ विरोधासाठी विरोध करताना दिसत होते व आहेत; त्या लढाईचा कळसाध्याय सध्या सुरू आहे आणि त्याची जबाबदारी भाजपात इतर पक्षातून आयात झालेल्या लोकांकडे आहे! त्यांचे रिंग मास्तर दिल्लीत , कर्तेधर्ते देवेंद्र फडणवीस साहेब , चेहरा चंद्रकांत दादा पाटील आहेत!
मुळात कुठल्या विषयावर काय बोलायचं, काय आरोप करायचे याचा धरबंद राहिलेला दिसत नाही! रणधुरंदर किरीट सोमय्या हे सातत्याने अनेक आरोप करत किती मंत्री जेलमधे जाणार, पुढे काय होणार हे सांगत इडी आणि इतर केंद्रीय यंत्रणा यांच्याच इशाऱ्यावर चालतात अशाप्रकारे वागताना दिसत आहेत! टिका करताना , महिलांबाबत बोलत असताना यांची जीभ घसरताना दिसते तर दुसरीकडे नारायण राणे व त्यांचे चिरंजीव दिशा … या अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत सुशांत सिंग प्रकरणापासून गंभीर आरोप करताना दिसत आहेत.
अनेकदा वृत्तवाहिन्यावर सामूहिक बलात्कार आणि खून याबाबत थेट आरोप त्यांनी केले! मृत अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे आणि हत्या झाल्याचे आरोप नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवांनी केले ! प्रश्न असा आहे की याप्रकरणाची चौकशी सीबीआयने केली आहे आणि त्यांना असे काही आढळून आल्याचे समोर आले नाही !
ज्याप्रमाणे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचे आरोप केले गेले ,मात्र केंद्रीय यंत्रणाच्या तपासात काही समोर आले नाही! बिहारच्या निवडणुकीनंतर सुशांत सिंग राजपूत चा विषय आणि आरोप मागे पडले !
आता महाराष्ट्रात सत्ता बदलाच्या तारखा सागण्याचा झपाटा सुरू आहे, तो पाहता अनाडी माणूस निवडणुका जवळ आल्यात हे सांगू शकतो! मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि महाराष्ट्र मुंबई वर असलेले केंद्रीय शक्तिमान लोकांचे लक्ष हा अत्यंत गंभीर विषय आहे!
महाराष्ट्रातील नेते,मग ते कोणत्याही पक्षाचे असो महाराष्ट्रबद्दल एकमताने एकत्र येताना दिसत नाहीत!
कधी हिंदुत्व,कधी भ्रष्टाचार तर कधी मराठी अस्मिता या विषयाभोवती राजकारण करत असताना ;आरोप-प्रत्यारोप करत असताना, अनेक वृत्तवाहिन्यांमधून जे काही समोर येते त्यावर आता जनतेलाही विश्वास ठेवावासा वाटत नाही, कारण जो काही लाईव्ह आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चाललेला दिसतोय त्यामध्ये काही अपवाद सोडले तर पत्रकार अभ्यासपूर्ण विषय मांडताना दिसत नाहीत! त्यामुळे समाजासमोर सत्य ही येताना दिसत नाही.
दिशा प्रकरणात जे काही गंभीर आरोप नितेश राणे वारंवार करत आहेत हे पाहता यामागची भूमिका विचारात घ्यावी लागते! जर खरोखरच या प्रकरणाचे काही ठोस पुरावे त्यांच्याकडे असते त्यांनी आजपर्यंत पोलिसांना दिले असते! तसे न करता फक्त वेळ आल्यावर सोयीने आरोप करण्यात असलेले स्वारस्य,
एखाद्या महिलेबद्दल अपमानजनक आणि समाजात तिची बदनामी होईल असे जाहीर वक्तव्य करणे, तिचा अपप्रचार करणे हे कायद्याने गुन्हा आहे! मृत असेल तरी तिच्या मरणानंतर तिच्याबद्दल बोलून तिच्या कुटुंबाला नातेवाईकांना अपमान वाटेल अशाप्रकारे नामनिर्देशित करणे त्याचा प्रचार करणे हा कायद्याने गुन्हा आहे, ही गोष्ट कायद्याचे रक्षक म्हणणाऱ्या पोलीस यंत्रणेला कळत नाही का? असा प्रश्न आमच्यासारख्या पत्रकारांना पडतो! महिला सुरक्षेच्या आणि सक्षमीकरणाच्या गप्पा मारणार नेते अशावेळी तोंडात गुळणी घेऊन गप्प बसतात ,कारण विषय राजकीय स्वार्थ हाच असतो! मात्र एक स्त्री म्हणून याबाबत बोलणे अत्यावश्यक आहे आणि ते बोलायला हवेच हे जेव्हा राजकारणातील, समाजकारणातील स्त्रियांना वाटू लागेल तेव्हाच खरे महिला सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल!
मात्र अशा गंभीर विषयात जोरदार आवाज उठताना दिसत नाही! मंत्री राठोड प्रकरणात पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली, त्यावेळी विविध वाहिन्यांवर ज्याप्रकारे तिच्या बातम्या आणि फोटो दाखवले जात होते ते अत्यंत गंभीर आणि बदनामी करणारे होते ;त्याबाबतची समज न्यायालयाने प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर हा विषय वाहिन्यांवर झळकण्याचा थांबला!
मात्र ज्या राजकीय नेत्यांनी ,भाजपात आलेल्या चित्रा वाघ यांनी याबाबत नामोल्लेख करून ,जाहीर वक्तव्य केली होती त्यांच्यावर काय कारवाई झाली? याबाबत राजकारण करणाऱ्या नेत्यांवर, बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी काय कारवाई केली हे सर्वांसमोर येण्याची गरज आहे, कारण राज्यातील महिला आणि त्यांची सुरक्षा ही जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच लोकनेते म्हणून निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचीही आणि मानली तर सर्वाचीच आहे!
सत्तेत असणार्या लोकांविरुद्ध कोणतेही आरोप केल्यास आघाडी सरकार आजवर बचावात्मक पवित्र्यात का राहिले ?आक्रमक शिवसेना,रणरागिणी सत्तेत आहोत म्हणून बॅकफूटवर राहिल्या? हे प्रश्न आहेतच!
सत्तेसाठी श्री सलमानची तोडून करता येते का असा प्रश्न वारंवार मनात येत राहिला विरोधी पक्षातील आक्रमकतेने स्त्री अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्या चित्रा वाघ काही प्रकरणात सोयीने आक्रमक तर काही प्रकरणात गप्प बसताना दिसतात, हा काय प्रकार आहे? स्त्री सन्मानाची भूमिका घेताना प्रत्येक विषयावर बोलणे अपेक्षित आहे पण तसे होताना दिसत नाही! राजकारणासाठी राजकारण करून महिलांच्या इभ्रतीला वेशीवर टांगण्याचा मक्ता कोणत्या राजकीय पक्षाला आहे? कायद्याने असे कोणते अधिकार त्यांना दिले आहेत त्यामुळे समाजात जाहीरपणे महिलांची नावे घेऊन ते बदनामी करतात?
महिलांवर अत्याचार झाला आहे तर आपल्याकडे असलेले पुरावे किंवा नसतीलही तरी त्याबाबतच्या तक्रारी पोलिसात जाऊन करणे हे त्यांचे पहिले कर्तव्य नाही का आणि जर ते असेल तर याचे भान त्यांना नाही का? केवळ तोंडाचा पट्टा सोडून आणि पैसा खिशात खुळखुळत आहे म्हणून चॅनलवर बोलणे आणि दिसणे हे राजकारण आहे का? असे प्रश्न महाराष्ट्रातील समस्त महिलांच्या मनात वारंवार येत आहेत!
काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाला दिशा बदनामी प्रकरणात दखल देण्याबाबत पत्र लिहिले .त्या पत्रात सीबीआय चौकशीचा उल्लेख केला आणि ही बदनामी थांबवावी अशी विनंती केली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तात्काळ, ४८ तासात याबाबतचा अहवाल पोलिसांना द्यावा म्हणून पत्र लिहून निर्देश दिले! त्यानंतरही आ नितेश राणे बोलतच आहेत!
मुळात राजकारण आणि समाजकारण स्त्री सन्मान, विनयभंग, बदनामी यातला फरक या लोकांना कळत नाही की आपल्याकडे असलेल्या सत्तेचा पैशाचा आपण कसाही वापर करू करू शकतो , आपलं कोणीही काही वाकडे करू शकणार नाही असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतो!
या गैरसमजाला खतपाणी देण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे असे म्हणण्यास पुर्ण वाव आहे ,कारण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ज्या प्रकारची महिलां अत्याचाराची प्रकरणे समोर आली, जाहीर पणे पिडितेची नावे घेऊन विविध माध्यमातून बदनामी केली, त्याबद्दल या सरकारने संबंधित राजकीय नेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली, हे जनतेसमोर आलेले नाही!
म्हणूनच जेव्हा मुंबईच्या प्रथम नागरिक ,मुंबईच्या महापौर यांच्याबाबत भाजपा नेते आ आशिष शेलार यांनी जे वक्तव्य केले, ते स्त्रीला लज्जित करणारे , अपमान करणारे होते यात दुमत नाही ! या प्रकरणात काय कारवाई झाली हे सरकारने सांगायला हवे!
मात्र महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा करताना फक्त कायदा करून भागत नाही तर त्याची अंमलबजावणी आणि पूर्वी असलेले कायदे यांचा आधार घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते आणि तीच आजची गरज आहे ! कोणीही व्यक्ती मग ती राजकीय नेता असो, स्त्रीची बदनामी करत असेल तर पोलीसांनी तत्काल कारवाई करायला हवी! पोलीस सुमोटोव्दारे तत्काल कारवाई का करत नाही? हा मोठा प्रश्न आहे!
महिला आयोग राष्ट्रवादीच्या अखत्यारीत, महिला बालकल्याण विभाग काँग्रेसच्या अखत्यारीत, महिला आयोगाच्या समितीवर सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्या! सत्ताधारी व विरोधक यांच्यात चाललेला खडाखडीचा आखाडा इथे आपल्याला दिसतो, कारण महिला सुरक्षेच्या विषयात खरंतर आजवर महिला आयोगावर राजकीय क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील महिलांना प्राधान्य मिळताना दिसले नाही आणि त्यामुळेच कोणत्याही विषयावर भूमिका घेतल्यानंतर त्याला राजकीय वळण लागताना दिसते!
असो सगळाच आनंद आहे! एका भयंकर आर्थिक, सामाजिक अराजकेच्या वाटेवर आपण चाललो आहोत!
इथे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सुरक्षित नाही तर पत्रकारांचा विषय काय?
आम्ही म्हणतो “सच्चा पत्रकारांना सक्षम करा,आम्ही असू सच्चाई सोबत!” महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचे स्त्री दाक्षिण्य, सन्मान चे आदर्शाची जपणूक कृतीतून दाखवून देणे आवश्यक आहे! अन्यथा महाराजांचा जयघोष हा केवळ दिखावा ठरेल! !
शेवटचे एकच सांगणे , आता बस्स झाले! महिलांवर अत्याचार होताच कामा नये, पण आधी ही राजकीय नेत्याव्दारे होणारी महिलांची बदनामी थांबवा! सरकार हे करणार नसेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींना रस्त्यावर उतरून एकेका माजोरड्याला ठीक करावं लागेल!
शीतल करदेकर
९८२१२०९८७०