खेड – खेड तालुक्यातील मुंबई-गोवा या महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीतील रंग तयार करणार्या श्रेयस इंटरमिजिएट या कारखान्यावर २८ डिसेंबर रोजी अचानक धाड टाकून जिल्हा कृषि विभागाने तब्बल १०८ मेट्रीक टन युरिया खताचा साठा जप्त केला. यावेळी बेकायदेशीररित्या खताचा साठा केला म्हणून कारवाई करणार असल्याचे वल्गना झाल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने यामागे काही गुपित दडले का ? याची चर्चा सध्या खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.
शेतकर्यांसाठी असलेल्या या खताचा वापर लोटे येथील या कंपनीत उत्पादन प्रक्रियेसाठी केला जात होता. कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान कंपनीच्या गोडावूनमध्ये आढळून आलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. अहवाल आल्यावर या प्रकरणी कारवाई केली जाणार होती. मात्र या घटेला एक महिना उलटला तरी अद्याप या कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने कृषि विभागाचे अधिकारीच या प्रकारात पाठिशी घालत तर नाही ना ? अशी चर्चा सध्या लोटे औद्योगिक वसाहत परिसरात ऐकावयास मिळत आहे.