चिपळूण – कोकणात होणारी काँग्रेसची वाताहत थांबवण्यासाठी आणि रिक्त असलेल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी सध्या चिपळूणचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आणि जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश कातकर यांच्यामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी प्रशांत यादव यांचे पारडे जड असून जिल्हाध्यक्ष पद त्यांनाच मिळणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी रत्नागिरी जिल्ह्यात मोठी चुरस होती. कालांतराने याच चुरशी मधून अनेकांनी माघार घेतल्याने आता फक्त जिल्हाध्यक्षपदासाठी दोनच उमेदवार इच्छुक आहेत. त्यात जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर हे जुने कांग्रेस सदस्य म्हणून तर डॅशिंग आणि तडाकेबाज नेतृत्व केलेले चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव हे सुद्धा जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने लवकरच रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असून गणपती बाप्पा कोणा पावणार ? याची चर्चा सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. एकीकडे याच जिल्हा अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी आपण इच्छुक नसल्याचे म्हटल्याने सध्या हे दोनच तगडे उमेदवार जिल्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र असं असलं तरी सुरेश कातकर आणि प्रशांत यादव या दोघांमधला असलेला समन्वय व त्या दोघांची काम करण्याची असलेली पद्धत ही अनेकांना भावत असल्याने या दोन्ही पैकी कुणीही जरी जिल्हाध्यक्ष झाले तरी कार्यकर्त्यांना आनंदच होणार आहे अशी चर्चा सुद्धा काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कोण ? याचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.