गुहागर – विवाहामधील वऱ्हाडी मंडळींनी आरटीपीसीआर चाचणी न करताच विवाह सोहळ्यात सहभाग घेतला म्हणून गुहागर पोलिसांनी यजमानांवरच १० हजाराच्या दंडाची कारवाई केली आहे. ही गुहागर तालुक्यातील पहिली घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील अडूर येथे गुरूवारी विवाह सोहळा सुरू होता. विवाहामध्ये उपस्थिती नियमात होती परंतू विवाहाकरीता जमलेल्यांनी कोणतीही आरटीपीसीआर चाचणी केली नव्हती. यामुळे आस्थापनावर व यजमान दत्ताराम तानाजी देवळे यांच्यावर १० हजार रूपये दंडाची कारवाई केली.
लग्न समारंभ म्हणजे गर्दी आलीच, म्हणून राज्य सरकारने कडक निर्बंध केले असताना शासनाने २५ लोकांची मर्यादा देऊन लग्न दोन तासात करा असा आदेश दिला असतानाही गुहागर तालुक्यामध्ये काही ग्रामीण भागामधून छुप्या पध्दतीने लग्न सोहळा आटपून घेत आहेत. असाच सोहळा करीत असताना शासनाच्या निर्बंधाचे पालन न करता या वऱ्हाडी मंडळीनी आपली आरटीपीआर चाचणी न करताच या सोहळ्यात सहभाग घेतला होता. गुहागर पोलिसांना या विवाह सोहळयाची माहिती मिळताच याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी जाऊन दंडात्मक कारवाई केली. यावेळी गुहागरचे उप निरिक्षक दीपक कदम, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष साळसकर विशाल वायंगणकर यांनी ही कारवाई केली.