दापोली -पत्रकार हा जेव्हा मूलतत्त्व सोडतो तेव्हा तो आपले सत्व गमावतो आणि म्हणूनच सामाजिक नीतिमत्तेची जपणूक करून मानव व समाज कल्याणार्थ काम करण्याची आवश्यकता पत्रकारितेमध्ये असल्याची गरज मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांनी व्यक्त केली. निमित्त होतं सम्यक व अम्लीफाय चेंज यांच्या विद्यमाने राज्यातील निवडक पत्रकारांसाठी घेतलेल्या कार्यशाळेचं.
मुंबई मराठी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये जानेवारीत पहिल्या टप्प्यातील तीन दिवसीय कार्यशाळा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय कार्यशाळा रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी दूर दृष्य माध्यमाद्वारे त्यांनी उपस्थित पत्रकार स्तंभलेखक लेखक व काही निवडक सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बातमीतील सत्यता पडताळणी, विश्वासाहर्ता, अचूक शब्द रचना, सामाजिक जबाबदारीची जाणीव, उत्तरदायित्व, निरपेक्ष बातमी, सत्यता, घटनाक्रमावर लक्ष, विषयाचा पाठपुरावा अशा साऱ्या निकषावर सत्व आणि तत्त्वांची जपणूक करत पत्रकारांना आपली जबाबदारी सांभाळावी लागेल. अशी विविध जबाबदारी आणि पत्रकारितेतील नीतिमत्तेच्या संदर्भाची जबाबदारी त्यांनी स्पष्ट केली.
पत्रकारितेत शिरलेले प्रमाद व त्या संबंधाने घडलेल्या घटनांचा आढावा देखील त्यांनी घेतला. शोध पत्रकारिता आणि व्यापक जनहितार्थ करावयाच्या पत्रकारितेतील कामाचा ऊहापोह डॉ. राजदीप यांनी केला. कार्यशाळेतील अनेक पत्रकारांनी त्यांना येणाऱ्या अडचणी नीतिनियम, सद्यस्थिती या अनुषंगाने प्रश्न विचारले.
लिंगभाव, समता, पितृसत्ता, स्त्रियांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, पत्रकारिता याविषयीच्या छत्तीस तासांच्या या कार्यशाळेमध्ये सम्यक संस्थेचे कार्यकारी संचालक आनंद पवार, दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे, मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप, विषय तज्ञ अभ्यासक प्रीतम पोतदार, मुक्त पत्रकार प्रियंका तुपे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी होऊन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पत्रकार, स्तंभलेखक, सामाजिक कार्यकर्ते यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले