गुहागर – गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असुन यामधील ८७२ अंड्यांचे यांचे जतन करण्यात आले आहे. तवसाळ समुद्रकिनारी पूर्वी मोठ्या प्रमाणात या जातीच्या कासवांची अंडी सापडत असत. कालांतरानंतर जेएसडब्ल्यू बंदर व चौगुले उद्योग समुहाचे बंदर विकसित झाल्यानंतर या ठिकाणी समुद्रातील वाहतुकीची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली.
मध्यंतरीच्या कालखंडात या समुद्रकिनारी मादी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. मात्र या वर्षी कासव प्रेमींना ही आगळीवेगळी पर्वणी निर्माण झाली आहे. गावातील कासव प्रेमी युवक महेश सुर्वे हा गेली दोन वर्ष वनविभागाची संबंधित आहे. या युवकाच्या लक्षात आल्यानंतर कासवांच्या अंड्याबाबतची माहिती त्याने तातडीने गुहागर तालुक्याचे वनपाल परशेटे, वनरक्षक श्री.मांडवकर यांच्याकडे ही बातमी पोचल्यानंतर वनविभागाच्या वतीने तातडीने याची दखल घेत या सर्व अंड्यांचे जतन व संरक्षण करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात या वर्षी एकाच समुद्रकिनारी एवढी कासवांची घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ असुन यामुळे कासव प्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. वनविभागाची समन्वयातून व सहकार्यातून दापोली तालुक्यातील केळशीच्या धर्तीवर तवसाळमध्ये सुद्धा कासव महोत्सव आयोजित करण्याच्या भावना तवसाळ कांदळवन समितीचे अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. या कासव महोत्सवामुळे तवसाळमधील पर्यटनात वाढ होऊन ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.