गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या विविध स्थानकांवरील उपाहारगृहे, पुस्तके-वर्तमानपत्र विक्रेते, फळ विक्रेते, उसाचे गुऱ्हाळ, पान टपरी, जनरल स्टोअर्स अशा विविध परवानाधारकांचे लॉकडाउनच्या काळात मोठे नुकसान झाले आहे. दि. २० ऑगस्टपासून आंतरराज्य वाहतुकीस परवानगी मिळाल्याने राज्य परिवहन वाहतूक बऱ्याच अंशी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नियम व अटीद्वारे आगारातील वाणिज्य आस्थापना सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विनय नातू यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे आहे.
जिल्ह्यातील सर्वच आगारातील प्रवासी सेवेकरिता असलेल्या वाणिज्य आस्थापनापैकी उपहारगृह अस्थापना सुरू ठेवण्यासाठी प्रवासी सुरक्षेची व कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन उपहारगृह चालकाना नियमावली आखून देणे आवश्यक आहे. राज्य परिवहन आगारातील आस्थापनांचा निविदा काळ मार्च ते सप्टेंबर अशा सात महिन्यांच्या कालावधी व्यवसाय बंद अवस्थेत होता. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोकणातील होळी, मे महिना, गणपती सुट्टी या हंगामात व्यवसाय बंद राहिल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे वाणिज्य आस्थापनांच्या परवाना शुल्कमध्ये सवलत द्यावी, अशीही मागणीही विनय नातू यांनी केली आहे.