गुहागर: — “स्वतः टीका करायची आणि दुसऱ्यांनी टीका केली की आगपाखड करायची, हा आ. भास्कर जाधव यांचा स्वभाव आहे. राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीपोटीच ते भाजपवर आकसाने टीका करीत आहेत,” असा घणाघाती पलटवार जिल्हा भाजप सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी केला. शृंगारतळी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आ. जाधव यांच्या विविध आरोपांचा समाचार घेतला.
शृंगारतळी येथील निळकंठेश्वर मंदिरात झालेल्या रामरक्षा महाआरतीच्या कार्यक्रमात आ. जाधव यांनी “भाजपमध्ये मटका किंग आहेत” असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सुर्वे यांनी थेट आव्हान देत, “गुहागर तालुक्यातील मटका, आकडा, जुगार, दारू यासह सर्वच अवैध व्यवसायांवर निष्पक्षपणे कारवाई करा. त्यानंतर कोणत्या पक्षाचे किती लोक यात गुंतले आहेत, कोणाचा कोणाला वरदहस्त आहे, हे आपोआप जनतेसमोर येईल,” असे सुनावले.
यासंदर्भात सुर्वे यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातही आ. जाधव यांच्या सोशल मीडियावरील वक्तव्याचा दाखला देत गुहागर तालुक्यातील अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः शृंगारतळी बाजारपेठेत भाजपचे लोक मटका, आकडा, जुगार व दारूचे धंदे करीत असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने, या आरोपांची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कारवाई झालेल्या अवैध धंद्यांची नावे व गावांची माहिती दररोज जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
‘भाजपमध्ये मटका किंग जास्त’; भास्कर जाधवांच्या वक्तव्याने गुहागरात राजकीय खळबळ
सुर्वे म्हणाले, “आ. जाधव एका बाजूला आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाचा अजेंडा राबवित रामरक्षा महाआरतीला उपस्थित राहतात आणि दुसऱ्या बाजूला व्यासपीठावरून भाजपवर आकसाने आरोप करतात. शृंगारतळीत मटका-जुगार चालविणारे भाजपचे आहेत, असे म्हणणे सोपे आहे; मात्र गुहागर तालुक्यातील वाळूमाफिया, अवैध चिरेखाणी, लाकूडतोड आणि बेकायदा उत्खनन यामध्ये कोणाचे लोक आहेत, कोणाचे अभय आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे.”
‘पंचायत समिती कुणाच्या बापाची नाही’ या वक्तव्यालाही प्रत्युत्तर
पंचायत समितीच्या कारभारावरूनही सुर्वे यांनी आ. जाधवांना प्रत्युत्तर दिले. “पंचायत समितीमध्ये सर्व पक्षांच्या सदस्यांना सन्मानाची वागणूक देत निधीचे समान वाटप केले जात असताना पंचायत समिती कुणाच्या बापाची नाही, असा आरोप आमच्यावर केला जातो. मात्र आम्ही त्यांचा बाप काढला तर चालेल का?” असा सवाल त्यांनी केला. “स्वतः दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि त्याच पद्धतीने प्रत्युत्तर मिळाल्यानंतर संताप व्यक्त करायचा, हा दुटप्पीपणा आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
गुहागर तालुक्यातील निरामय रुग्णालय सुरू करण्याच्या प्रश्नावरही सुर्वे यांनी आ. जाधव यांना लक्ष्य केले. “रुग्णालय सुरू व्हावे यासाठी सर्वच पक्षांचे नेते प्रयत्न करीत आहेत. मात्र आ. जाधव या प्रश्नावर डॉ. नातू यांना दोष देत आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असते, तर आम्हाला आनंद झाला असता,” असे सुर्वे म्हणाले. दरम्यान, अवैध धंद्यांवर कारवाईच्या मुद्द्यावरून आता गुहागरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले असून, ‘कारवाई करा आणि सत्य जनतेसमोर आणा’ या निलेश सुर्वे यांच्या आव्हानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















