तुमची साथ हिच माझी ताकद; भाजप मजबूत करण्यासाठी जीवाचे रान करूया — प्रशांत यादव

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – “आमदार, खासदार किंवा कोणतेही पद मिळणे ही मोठी गोष्ट असली, तरी संकटाच्या काळात नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कार्यकर्ता हीच माझी सर्वात मोठी ताकद, कमाई आणि ओळख आहे,” अशा भावनिक शब्दांत भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

भाजप प्रवेशाच्या वर्षपूर्तीनिमित्त चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित भव्य स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रशांत यादव यांच्या गेल्या वर्षभरातील राजकीय आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणाऱ्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील पराभव हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता, असे सांगताना यादव भावुक झाले. “त्या काळात अनेक कार्यकर्ते मानसिकदृष्ट्या खचले होते. मात्र त्यांनी माझी साथ सोडली नाही. तुमच्यासारखे दगडाला घाम फोडणारे सैनिक सोबत असतील, तर कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही,” असे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने १९ ऑगस्ट २०२५ रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्याची आठवण यादव यांनी सांगितली. प्रवेशाच्या आदल्या रात्री मुसळधार पावसामुळे घरासमोर पाणी साचले, पत्नी स्वप्ना यादव यांची गाडी अडकली; तरीही कार्यकर्त्यांनी पहाटेपासून मुंबईकडे प्रस्थान केले. “मतदारसंघाच्या टोकापासून वालोपेपर्यंत कार्यकर्ते माझ्यासोबत आले. त्या दिवशी जाणवलं की संकटात सोबत उभा राहणारा कार्यकर्ता हीच खरी संपत्ती आहे,” असे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये प्रवेशानंतर पक्ष नेतृत्वाने सन्मान, जबाबदारी आणि काम करण्याची संधी दिली. जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनीही आपलेपणाने स्वीकारल्याचे सांगत यादव म्हणाले, “हा केवळ माझा पक्ष नाही, हा तुमचा पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतली जाईल. कोकणातील शेतकरी, महिला आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगत यादव यांनी रोजगारनिर्मिती, विकास आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी काम करण्याची भूमिका स्पष्ट केली.”राष्ट्र प्रथम, संघटना नंतर आणि शेवटी स्वतः” या विचाराने काम करण्याचे आवाहन करत आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजप अधिक मजबूत करण्यासाठी जीवाचे रान करू, अशी घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमानंतर प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क ठेवा, कोणी नाराज असेल तर त्याला पुन्हा सोबत घ्या, असे आवाहन करत यादव म्हणाले, “कमळ ही आपली ताकद, स्वाभिमान आणि ओळख आहे.”यावेळी ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेविका वैशाली निमकर, माजी पंचायत समिती सदस्या रेश्मा पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित निकम, जिल्हा खजिनदार आशिष खातू, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, शहर प्रभारी विजय चितळे, ग्रामीण प्रभारी रामदास राणे, दत्ताराम लिंगायत, विनोद म्हस्के आदींनी प्रशांत यादव यांच्या वर्षभरातील कार्याचे कौतुक केले. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने “२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव आमदार व्हावेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू” अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमाला भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, अभिजित शेट्ये, स्वानंद रानडे, सुप्रिया उतेकर, प्रमोद अधटराव, मृणाल शेट्ये, रुपाली दांडेकर, विनोद भुरण, शशिकांत मोदी, रामदास राणे, रूपेश कदम, विनोद म्हस्के, ॲड. नयना पवार, शुभम पिसे, संदीप भिसे, अंजली कदम, शीतल रानडे, रावी मोरे, उदय घाग, नीलेश भुरण, कविता नार्वेकर, सुप्रिया देवरुखकर, सायली वाजे, आदिती गुडेकर, रत्नदीप देवळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here