प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाला एक वर्ष; रत्नागिरी दक्षिण भाजपच्या पुढील वाटचालीची दिशा उद्या ठरणार

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांच्या भाजपमधील प्रवेशाला एक वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) चिपळुणात भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून गेल्या वर्षभरातील संघटनात्मक कामाचा आढावा घेत आगामी काळातील पक्षविस्तार आणि संघटनबळकटीची दिशा निश्चित केली जाणार आहे.
प्रशांत यादव यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथस्तरावरील संघटनेशी संपर्क वाढवत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यांना प्राधान्य देत पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कालावधीत करण्यात आला. त्यामुळे वर्षपूर्तीचा हा कार्यक्रम केवळ औपचारिक सोहळा न राहता पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीचा रोडमॅप ठरविणारा मेळावा म्हणून पाहिला जात आहे.
यावेळी कार्यकर्त्यांच्या सहभागातून आगामी काळातील संघटन विस्तार, बूथ पातळीवरील बांधणी, नागरिकांशी संपर्क आणि विकासाच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे काम करण्याबाबत चर्चा होणार आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या विचारातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे. हा स्नेहमेळावा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह, प्रांत कार्यालयाच्या मागे, शिवाजीनगर, चिपळूण येथे होणार आहे.
वर्षभराच्या कार्यप्रवासानंतर आता आगामी काळात पक्ष संघटनेला आणखी बळ देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, बूथस्तरीय पदाधिकारी आणि पक्षाशी संबंधित प्रमुख व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने या स्नेहमेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here