“भूमिगत केबलच्या नावाखाली गुहागरचे रस्ते उद्ध्वस्त; पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती आक्रमक

0
1
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यात महावितरणच्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न पंचायत समितीच्या मासिक सभेत चांगलाच गाजला. अनेक ठिकाणी खोदकामानंतर रस्त्यांच्या साईडपट्ट्या तसेच खड्डे न भरल्याने अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित ठेकेदाराने तातडीने सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनी घेतली.

सभेत सदस्यांनी मोडकाघर–अडूर मार्गासह विविध रस्त्यांची दुरवस्था निदर्शनास आणून दिली. अंजनवेल परिसरात खोदकामानंतर भराव खचल्याने गटारातील माती रस्त्यावर आली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाबही उपस्थित करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खोदकामासाठी आवश्यक शुल्क भरले जाते, मात्र जिल्हा परिषद रस्त्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया का पाळली गेली नाही, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.

पालशेत येथे ३० मेपर्यंत बसविण्यात येणारा मंजूर डीपी अद्याप कार्यान्वित न झाल्याबद्दलही महावितरणला जाब विचारण्यात आला. संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सभेत आरोग्य विभागाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ योजनेची माहिती दिली. सामाजिक वनीकरण विभागाने तयार केलेल्या रोपांचे वितरण आणि त्यांची लागवड याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत विहिरींसाठी संमतीपत्र असूनही बक्षीसपत्राच्या अभावी वीजजोडणी रखडत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. याच बैठकीत सांख्यिकी विभागाच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. विस्तार अधिकारी चिराग घाग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या महिन्यात ६५० घरकुलांचे हप्ते नियमित करून दिले, तर ७५ घरकुले पूर्णत्वास नेली. आणखी १८६ घरकुलांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. या कामगिरीबद्दल सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनी विभागाचे अभिनंदन केले.

रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या स्मारकाची मागणी

बैठकीत उपसभापती नीलेश सुर्वे यांनी सामाजिक न्यायाच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी रावबहाद्दूर सीताराम केशव बोले यांच्या जन्मस्थळ पालशेत किंवा मूळ गाव आरे येथे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव मांडला. अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार आणि महाड चवदार तळे सत्याग्रहातील त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून शासनाने स्मारक उभारावे, अशी मागणी त्यांनी केली


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here