गुहागर समुद्रकिनारी थरार! दोन पर्यटक बुडण्याच्या स्थितीत; जीवक्षकांनी केले धाडसी बचावकार्य

0
1
बातम्या शेअर करा

गुहागर – स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर काही क्षणांसाठी संकटाचे सावट आले. समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन पर्यटक पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले. मात्र, समुद्रकिनारी कर्तव्यावर तैनात असलेल्या जीवक्षकांच्या सतर्कतेमुळे दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली.
१५ ऑगस्टच्या सुटीनिमित्त आठ पर्यटकांचा एक गट गुहागर समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा आनंद घेत असताना चिपळूण येथील गफार भट आणि झारखंड येथील हिरालाल कर्मली हे दोघे समुद्राच्या पाण्यात उतरले. सुरुवातीला पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असताना अचानक समुद्राच्या लाटांचा वेग वाढला. पाण्याची खोली आणि लाटांचा जोर यांचा अंदाज न आल्याने काही क्षणांतच दोघेही खोल पाण्याच्या दिशेने ओढले गेले. दोघे बुडण्याच्या स्थितीत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनारी तैनात असलेल्या गुहागर नगरपंचायतीचे जीवक्षक प्रदीप तांदेल आणि साहिल तोडणकर यांनी तातडीने परिस्थितीचा अंदाज घेतला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी समुद्रात धाव घेतली. पावसामुळे समुद्राला आलेला उधाणाचा जोर, मोठ्या लाटा आणि खोल पाण्याचा प्रवाह अशा प्रतिकूल परिस्थितीतही जीवक्षकांनी दोन्ही पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्याकडे आणले.
विशेष म्हणजे, ही घटना घडली त्यावेळी समुद्रकिनारी पावसाचे वातावरण होते. पावसाळ्यात समुद्राच्या लाटांचे स्वरूप काही क्षणांत बदलू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत जीवक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन पर्यटकांचे प्राण वाचले. जीवक्षक प्रदीप तांडेल आणि साहिल तोडणकर यांच्या धाडसाचे तसेच कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समुद्रकिनारी तैनात असलेल्या जीवक्षकांची नजर सतत समुद्रातील हालचालींवर असल्यानेच संकटाची चाहूल लागताच तातडीने मदत पोहोचवता आली.
या घटनेनंतर पर्यटकांनीही पावसाळ्यात समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. समुद्र कितीही शांत दिसत असला तरी पावसाळ्यात लाटांचा वेग आणि पाण्याचा प्रवाह अचानक बदलू शकतो. त्यामुळे जीवक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता केवळ सुरक्षित भागातच समुद्राचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुहागर समुद्रकिनारी घडलेल्या या घटनेत जीवक्षकांनी वेळीच केलेल्या बचावकार्यामुळे दोन पर्यटकांना अक्षरशः जीवदान मिळाले. त्यांच्या सतर्कतेमुळे स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत घडू शकणारी मोठी दुर्घटना टळली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here