दापोली – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेलाच धोकादायक वाहतुकीचे गालबोट लागल्याचा प्रकार दापोलीत समोर आला आहे. राधाकृष्ण मंदिर येथे लायन्स क्लब दापोलीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची ने-आण करताना सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने एका वाहनातून नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाहनाच्या मागील बाजूस मोठ्या संख्येने विद्यार्थी उभे असल्याचे, तर काही विद्यार्थी लोखंडी दांड्यांना धरून प्रवास करत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे एखाद्या क्षणी वाहनाला ब्रेक लागल्यास किंवा अपघात झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
‘स्पर्धा महत्त्वाची की विद्यार्थ्यांची सुरक्षा?’
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करणे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करण्याची जबाबदारीही आयोजकांवर तितकीच असते. सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध न करता विद्यार्थ्यांना अशा धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागणे हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.
वाहन असुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांनी भरलेले असताना अचानक ब्रेक लागणे, रस्त्यावर खड्डा येणे किंवा वाहनाचा अपघात होणे यापैकी कोणतीही घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारांकडे केवळ वाहतूक नियमांचा विषय म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
स्पर्धेचे आयोजन करताना विद्यार्थ्यांची संख्या, त्यांची वाहतूक, वाहनाची क्षमता आणि सुरक्षेच्या उपाययोजना यांचे योग्य नियोजन झाले होते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात स्पर्धेत सहभागी करून घेणे ही आयोजकांची प्राथमिक जबाबदारी असल्याने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी पालक व नागरिकांमधून होत आहे.स्पर्धा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असावी; त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ठरू नये, एवढीच अपेक्षा!
















