
चिपळूण- चिपळूणमध्ये सामाजिक सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चिपळूणवासीयांशी थेट संवाद साधत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमठवला. क्लास-वन अधिकारी असूनही थेट ग्राउंड लेव्हलवर येऊन संवाद साधण्याची त्यांची पद्धत नागरिकांना भावली. परिणामी, त्यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढला आहे.
या बैठकीचा मुख्य उद्देश सामाजिक सलोखा राखण्यासंदर्भात जनजागृती करणे हा असला, तरी चिपळूणची जनता या बाबतीत आधीपासूनच जागरूक आणि सहकार्यशील असल्याचे पोलीस अधीक्षकांनी आवर्जून नमूद केले. पोलीस खात्याच्या या उपक्रमातून समाजकंटकांना चपराक मिळाली असून, सामान्य जनतेमध्ये विश्वास वाढीस लागला आहे. बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक बगाटे यांनी उपस्थित नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समस्या मनपूर्वक ऐकून घेतल्या. “कधीही हाक मारा, मी धावून येईन,” असा दिलासा देत त्यांनी आपली तत्परता अधोरेखित केली.
महत्त्वपूर्ण घोषणा :
◾अंमली पदार्थविरोधी मोहीम – तस्करांवर कठोर कारवाई
▪️ नवीन अॅप लवकरच सुरू – नागरिकांच्या थेट संपर्कासाठी
▪️ कर्णकर्कश सायलेंसरवर कारवाई – दुचाकी स्वारांवर कारवाई, सायलेंसर जप्त
▪️ महिला सुरक्षा प्राधान्यक्रमावर – सर्वतोपरी संरक्षणाची ग्वाही
▪️ ट्रॅफिक व्यवस्था सुधारणा – खेर्डी चौकी लवकर सुरू होणार
या बैठकीत पोलीस उपअधीक्षक राजमाने, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीने चिपळूणवासीयांना नवा उत्साह मिळाला आहे. या बैठकीला चिपळूण तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, महिला दक्षता समितीच्या सदस्य, व्यापारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पत्रकार, वरिष्ठ नागरिक तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी- उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, माजी तालुका संघटक, महिला दक्षता समितीच्या रेष्मा पवार, प्रिया भुवड, ललिता गजमल, अर्चना कारेकर, युवासेना कार्यकर्ता अथर्व चव्हाण, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष सचिन चोरगे व इतर मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य कृतीत उतरवले जात असल्याची प्रचिती चिपळूणवासीयांना या बैठकीतून मिळाली. आता नागरिकांची जबाबदारीही अधिक वाढली असून, समाजाच्या शांतता व सुरक्षेसाठी पोलीस खात्याशी खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.