चिपळूण- साडेतीनशे वर्षांपूर्वी याच मतदारसंघात संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्याबरोबर गद्दारी झाली, ती जखम अजून भळभळतेय. त्या वेदना अजून होत आहेत पण शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे कसे हे शंभूराजे शिकवून गेलेत आता पुन्हा येथे गद्दारी झाली आहे. हा कडक पाषाणाचा सह्याद्री आहे. येथे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. गेल्यावेळी आलो आणि चिपळूणच्या चौकात भगवा नाचवला, त्यामुळे काही लोकांना बळ मिळाले होते, पण यावेळी गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकवण्यासाठी आलोय, अशा आक्रमक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी तुफान संवादकेक आणि डायलॉगबाजी करत चिपळूण येथील सभा अक्षरशः गाजवून सोडली. ही महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे लक्षात ठेवून मतदान करा, आणि प्रशांत यादव यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी मिरवणुकीला मी स्वतः येतो असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत चिपळूण बहादूरशेख येथील वि. दा. सावरकर मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवाती पासूनच आक्रमक पवित्रा घेत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेबांचे वादळ आले असे सांगितले जात होते. परंतु यावेळी वादळ नव्हे तर चक्क सुनामी आलेली आहे. या सुनामीत गद्दारांचा पाळापाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही. येथून जरा गुहागरला जाण्याची इच्छा होती. पण पुढे आणखी चार सभा आहेत. त्यामुळे वेळ मिळत नाहीये, अन्यथा तिथे देखील जरा खळबळ उडवून आलो असतो. असेही ते म्हणाले.
मी शिवसेनेत काम केलंय, त्यामुळे मला चांगले माहीत आहे. शिवसैनिक सहजासहजी पेटत नाही. पण एकदा का पेटला की मग त्याला शांत करणे कोणालाही श्यक्य नाही. तो अंगार आहे आणि आता मी पूर्ण महाराष्ट्रात बघतोय तेच चित्र चिपळूणमध्ये ही बघतोय, शिवसैनिक पेटलाय, आता त्याला थांबवणे कोणाच्या बापालाही शक्य नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला जी वागणूक दिली गेली ती शिवसैनिकांना पेटवणारी ठरली आहे. शिवसैनिक संतापला आहे. पक्षप्रमुखांच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो तडफडतो आहे. त्यामुळे समोरच्यांनी आता सावध रहावे, असे अमोल कोल्हे यांनी म्हणताच गर्दीतून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि संपूर्ण परिसर दणाणून गेला. अमोल कोल्हे आज चांगलेच आक्रमक दिसत होते. ते म्हणाले उद्धव ठाकरे गंभीर आजारात पडलेले असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी रातोरात पळून गेले. पुढे त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले, पक्ष आणि चिन्हे चोरले. अरे पाठीमागून कसले वार करता,.? अरे समोरासमोर मैदानात लढायचे होते ना…! रक्त आठवून घाम गाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष एका रात्रीत पळवता.? शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादीचे निरीक्षक बबन कनावजे, रहिमान शेख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच रिपब्लिकन पक्षाचे सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी मैदान जणू कमी पडले इतकी तुफान गर्दी उसळली होती. पुन्हा एकदा गर्दीचा उच्चांक या मैदानात पाहण्यास मिळाला.