टीका करणाऱ्यांची कुवत मी ओळखतो …मी एकदाच टिचकी मारली तर समोरच्याची बोलती बंद होईल- भास्कर जाधव

0
663
बातम्या शेअर करा

गुहागर – मी कोणत्याही पक्षावर टीका करीत नाही. भारतीय जनता पार्टीवरही केलेली नाही. मात्र, दररोज उठून कोण मला डिवचत असेल व टीका करत असेल तर मी एकदाच अशी टिचकी मारतो, की सहा महिन्यातच टीका करणाऱ्याची बोलती बंद होईल, असा गर्भित इशारा देऊन टीका करणाऱ्यांची कुवत मी ओळखतो, अशी खरमरीत टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.

गुहागर तालुक्यातील काळसूर-कौंढर येथील नळपाणी योजना व झोंबडी-गिमवी रस्ता कामांचे भूमीपूजन आमदार भास्कर जाधव यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी सातत्याने टिका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. माझ्यावर टीका करणाऱ्यांची कुवत, पात्रता मी ओळखतो. त्यामुळे त्याला सातत्याने प्रतिउत्तर देण्याचे मी टाळतो. मात्र, दररोज उठून कोण माझ्याविरोधात बोलत असेल तर त्याची बोलती कशी बंद करायची हे मला चांगलेच माहित आहे. कित्येक गावात सुरु असणाऱ्या नळपाणी योजनांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पाणी योजनांची कामे किंवा रस्ते तयार करताना त्याविषयी माहिती करुन घेत जा. त्यातील कामे वेळेवर होतात की नाही, ही जबाबदारी तेथील नागरिकांची आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांचे सोटेलोट असतात. त्यामुळे एखादे काम निकृष्ट झाले की, माझ्याकडे तक्रार येते. कामे मंजूर पण करुन द्यायची आणि तक्रारी पण आपणच ऐकायच्या त्यामुळे कधी कधी प्रश्न पडतो, आपण काम मंजूर करण्यात चूक नाही ना केली, असे वाटते. त्यामुळे विशेष करुन पाणी योजनांची कामे होताना त्याचा कामावर लक्ष ठेवावे, अशा सूचना आमदार जाधव यांनी येथील नागरिकांना केल्या.

2019 च्या निवडणुकीत मी पक्ष बदलला. का बदलला यावर भाष्य करणार नाही मात्र, त्यावेळी तुम्ही सर्वांनी मला मतदान केले नाहीत. याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही. तुमच्या पक्षालाच मतदान केलात. आपले पूर्वीपासूचे संबंध आहेत. एका ठिकाणी बसलेले आहोत, एका ताटात जेवलेलो आहोत. त्यामुळे नाराजीचे कारण नाही. मात्र, या भागातील विकासकामांना आपण अधिक प्राधान्य दिलेले असून यापुढे तुम्ही जिथे बोट दाखवालं तेथे विकास काम केले जाईल, अशी ग्वाही आमदार जाधव यांनी दिली. सुरळपासून जामसूद-पिंपर -उंबराठ ते पालशेत, हेदवी, कर्दे अगदी जांभारी, तवसाळपर्यंत रस्ते आपण चांगले करु शकलो आहोत. काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही झाले आहेत. गेल्या 10 वर्षात आपण रस्ते चांगले केलेले आहेत. त्यामुळे विकासकामांमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नसून तुम्ही विकासकाम करणाऱ्याला विसरु नका, असेही आमदार जाधव यांनी उपस्थित नागरिकांना जाणीव करुन दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here