चिपळूण – आगामी काळात नगरपरिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या ५० टक्के जागा युवक काँग्रेस लढविणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अल्पेश मोरे यांनी केले.
जिल्ह्यात आगामी काळात नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची तयारी प्रशासनाकडून चालू आहे. काँग्रेस पक्षाने सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक जाधव, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी आमदार हुस्नबानू खलिफे तसेच अल्पेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याची तयारी जोरदारपणे केली आहे. त्याच अनुषंगाने युवक काँग्रेसमार्फत जिल्ह्यातील युवकांना व युवतींना राजकारणाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता यावे व समाजाची सेवा करता यावी यासाठी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुचनेनुसार सर्व निवडणुकीत ५० टक्के जागा युवकांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीत काँग्रेस पक्ष ५० टक्के जागा युवकांसाठी राखीव ठेऊन सर्वसामान्य घरातील युवकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील जे-जे युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तात्काळ जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव मंदार सप्रे ८८०६८७८९८९, महासचिव अरविंद तावडे ९७०२९७९७९७, चेतन नवरंगे ९७६५११९१०८, यश पिसे ९०२८१०२६६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अल्पेश मोरे यांनी केले आहे.