चिपळूण- पावसाळ्यात न भूतो न भविष्यती अशा अतिवृष्टीसह मुबलक पाऊस कोसळूनही फेब्रुवारी महिन्यापासूनच चिपळूण तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
यावर्षी उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. ठिकठिकाणचे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत. तर विहिरींमध्येही खडखडाट दिसून येत असल्याने तालुक्यातील १४ गावांतील १० वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत या वाड्यांना तीन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर अनारी, कुडप, येगाव व रिक्टोली आदी गावांनीही टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली असून भविष्यात टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या वाड्यांतील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरु झाली. मार्च महिना उजाडताच चिपळूण तालुक्यातील अडरे-धनगरवाडी, खडपोली-गोकुळवाडी या वाड्यांतून तहसिल कार्यालयाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. सर्वेक्षणाअंती या दोन्ही वाड्यांना खासगी टँकरद्वारे पाणीपुरठा सुरु करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत गाणे-धनगरवाडी, राजवाडी, कोंडमळी-धनगरवाडी, तिवडी-भटवाडी, कादवड-धनगरवाडी, धनगरवाडी, नांदगाव खुर्द-लोहारवाडी, सावर्डे-धनगरवाडी, ओवळी-धनगरवाडी, टेरव-धनगरवाडी, शिरवली-येलोंरेवाडी, गुढे-कदमवाडी, डेरवण-धनगरवाडी, तळसर-धनगरवाडी आदी गावांना तीन खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अनारी-बौद्धवाडी, धनगरवाडीसह कुडप, येगाव, रिक्टोली आदी गावांनीही चिपळूर पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे.