मार्गताम्हाने– ज्याला व्याप असतो तो व्यापारी. तो सतत
दिवसरात्र ग्राहकाच्या गराड्यातच असतो. ग्राहकाशिवाय तो शून्य आहे असे सांगून व्यापाऱ्यांनी ग्राहक हेच आपले दैवत मानावे, असे व्यावहारिक मार्गदर्शन चिपळूण प्रसिध्द केशव आप्पा ओक पेढीचे मंदार ओक यांनी केले.
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने पंचक्रोशी व्यापारी संघटनेचा भव्य मेळावा उमरोली येथील चैतन्य मंगल कार्यालयात बुधवारी संध्याकाळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खातू मसाले उद्योग समूहाचे ज्येष्ठ उद्योजक शालिग्राम खातू, शृंगारतळीतील प्रसिध्द
व्यापारी नासिमशेठ मालाणी, मोहन संसारे, चिपळूणातील प्रतिष्ठीत व्यापारी वासुदेव भांबुरे, शेखर चितळे, शैलेश वरवाडकर, सुरेश साळवी, मनोहर साळवी यांच्यासह मार्गताम्हाने पंचक्रोशीतील सुमारे २०० जुने-नवे व्यापारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा व जुन्या वयोवृध्द व्यापाऱ्यांचा संघटनेच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रशासन याबाबत लायसन कुठे आणि कसे काढायचे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंदार ओक यांनी व्यापार कसा करावा, आलेल्या ग्राहकाशी कसे वागावे, बोलावे यावर मार्गदर्शन केले. ग्राहक हे आपले दैवत आहे. त्याला कोणत्याही प्रकारे तोडू नये, एकदा ग्राहक तुटला की आपले नुकसान होते. त्याला समजून घेतले पाहिजे, असे स्पष्ट केले. यानंतर मोहन संसारे यांनी व्यापार आणि अध्यात्मिकता यांची सांगड घालून व ग्राहकाचे हित जपून व्यापार करावा, असे सूचित केले. तसेच कोरोना काळात व्यापाऱ्यांना नागरिकांनी केलेले सहकार्य न विसरण्यासारखे आहे, असेही उद्गार संसारे यांनी काढले. शालिग्राम खातू यांनी उद्योग उभारताना स्वतःला आलेले अनुभव सांगून आहे त्या उद्योगाचा विस्तार कसा करायचा व वाढवायचा यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी या मेळाव्याचा उद्देश, आजपर्यंत आपल्या पाठिशी असलेल्या जुन्या व्यापाऱ्यांविषयीची आत्मियता, नव्या
व्यापाऱ्यांचे मिळणारे सहकार्य यावर भाष्य करुन त्यांचे आभार मानले.
संघटना वाढीसाठी इतर व्यापाऱ्यांनी सभासद होऊन संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच दरवर्षी असा मेळावा घेण्यात येईल असेही स्पष्ट केले. सूत्रसंचालन संदेश खेडेकर यांनी केले. आभार सुरेश गांधी यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी तरुण व्यापारी गौरव गांधी, संतोष थरवळ, दिनेश गांधी, शेखर वाडकर, सौरभ चव्हाण आदींनी सहकार्य केले. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.